पिंपरी – यंदा गेल्या अनेक वर्षांमधील अधिक कडक उन्हाळा सुरू आहे. पारा 40 च्या पुढे जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक, मुले, मुली महापालिकेच्या जलतरण तलावावर पोहण्यासाठी गर्दी करत आहेत. तसेच एक तास पोहण्यासाठी फक्त दहा रूपये तिकीट दर असल्यामुळेही पालिकेच्या जलतरण तलावावर तुफान गर्दी होत आहे. त्यातच पाण्याची टंचाई व इतर रख-रखावाचा वाढता खर्च पाहता महापालिका प्रशासन जलतरण तलावाचे शुल्क वाढविण्याचा विचार करत आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिकेचे शहरात 13 जलतरण तलाव आहेत. मात्र, यामधील फक्त चार जलतरण तलाव सुरू आहेत. त्यामुळे या जलतरण तलावावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तलावाची एका वेळी 80 ते 100 ची क्षमता असताना 300 ते 400 जण पोहण्यासाठी येत असल्याने पालिकेला काही वेळा जलतरण तलाव बंद ठेवण्याची वेळ येत आहे. तिकीट दर कमी असल्यानेही मोठी गर्दी होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून फक्त दहा रूपयेच तिकीट दर आहेत. परंतु जलतरण तलाव सुस्थितीत ठेवण्यासाठी इतर खर्च मात्र वाढले आहेत. यामुळे तिकीट दरात वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे पालिका अधिकाऱ्यांना वाटत आहेत. त्यानुसार 20 रूपये किंवा 30 रूपये तिकीट दर करण्याची शक्यता आहे.