नवी दिल्ली : देशातील अनेक वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ऊर्जेचे संकट अधिक गडद झाले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कोळसा संकटाला सामोरे जाण्यासाठी आणि कोळशाची वाहतूक सुलभ करण्यासाठी रेल्वेने अनेक प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत, जेणेकरून कोळसा वाहून नेणाऱ्या मालवाहू गाड्या अधिक वेगाने चालवता येतील आणि त्या वेळेवर नियोजित स्थानकांवर पोहोचवता येतील.
कडाक्याचे ऊन पडत असताना आणि विजेची मागणी सातत्याने वाढत असतानाच देशातील विजेचे संकट अधिक गडद झाले आहे. दरम्यान, वीजनिर्मिती केंद्रांमध्ये एकीकडे कोळशाची मागणी वाढली आहे तर दुसरीकडे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. देशातील सुमारे 70% वीज थर्मल पॉवर स्टेशन्समधून तयार केली जाते.
कोळशाच्या संकटामुळे भारतातील अनेक भाग दीर्घ काळापासून लोडशेडींगमध्ये आहेत, तर काही उद्योग इंधनाच्या कमतरतेमुळे उत्पादनात कपात करत आहेत. करोना महामारीनंतर उद्भवलेल्या मंदीचे मळभ दूर होताना दिसत असतानाच आता कोळसा टंचाईच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसा टंचाईमुळे आगामी काळात महागाई आणखी वाढू शकते असेही जाणकार सांगतात.
प्रवासी गाड्या रद्द करण्याचा उपाय तात्पुरता
आशियातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेचे कार्यकारी संचालक गौरव कृष्ण बन्सल म्हणाले की, प्रवासी गाड्या रद्द करण्याचा हा उपाय तात्पुरता आहे आणि परिस्थिती सामान्य होताच प्रवासी सेवा पूर्ववत केल्या जातील. ते म्हणाले की, वीज प्रकल्पांना कोळसा वाहतूक करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कोळशाच्या वाहतुकीला होत असलेल्या विलंबासाठी अनेकदा रेल्वेला जबाबदार धरण्यात आले आहे. वाहने आणि रेकचा अभाव ही देखील मोठी समस्या आहे. हे पाहता रेल्वेने आपल्या ताफ्यात आणखी एक लाख वॅगन्स समाविष्ट करण्याची योजना आखली आहे. याशिवाय, मालाच्या जलद वाहतुकीसाठी रेल्वे एक समर्पित फ्रेट कॉरिडॉर देखील तयार करत आहे.