मुंबई – महाराष्ट्रावर अतिवृष्टी, महापूर, वादळ असे कोणतेही नैसर्गिक संकट आल्यावर महाविकास आघाडी सरकारने जेवढी मदत केली तेवढी यापूर्वीच्या काळात कधीही झालेली नाही. आमच्या सरकारने शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. कोरोनाच्या काळातही आमच्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही कधी विसरलेलो नाही. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आताच्या बजेट मध्येही वेळेवर कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणीसुद्धा यावर्षी पासून होणार आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याचं कोणतही कारण दिसत नाही.
त्यांनी एखादी गोष्ट मला अथवा इतर मंत्र्यांना सांगितली आणि कामाला नकार दिला गेला, असे झाल्याचेही मला कधी आठवत नाही. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही व त्यांनी महाविकास आघाडीतच राहावे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष या देशातील शेतकऱ्यांना चिरडण्याचे काम करत आहे. खतांचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्य दरांनीही शंभरी पार केली आहे. या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे राजू शेट्टींनी महाविकास आघाडीसोबतच राहून त्यांचा प्रतिवाद करणं आणि यासाठी सर्व पक्षांची ताकद एकजूट करून देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणं, हे जास्त अभिप्रेत आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यापासून माझी त्यांच्याशी भेट झालेली नाही, त्यांच्याशी भेट झाली तर नक्कीच मी त्यांच्याशी चर्चा करेन, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.