पुणे –राज्यात मागील वर्षात पडलेला पाऊस तसेच भुजल पातळीचा अभ्यास केला असता राज्यातील सहा जिल्ह्यांतील 15 तालुक्यांमधील 269 गावांमध्ये एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाई जाणवू शकते, अशी शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील 58 गावांचा समावेश आहे. या संभाव्य पाणीटंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना भुजल विभागाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने विहिरी खोल करणे, विहिरींमधील गाळ काढणे, खासगी विहिरी ताब्यात घेणे, टॅंकरने पाणीपुरवठा करणे आणि नवीन बोअरवेल घेणे आदी कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भूजल सर्वेक्षण विभागाने भुजल पातळीचा अभ्यास करून संभाव्य पाणीटंचाई अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यामध्ये ही निरीक्षणे नोंदवली आहेत. भुजल विभागाने मागील पाच वर्षांच्या भुजल पातळीचा अभ्यास केला आहे. राज्यातील 14 तालुक्यांमध्ये भुजल पातळी ही 1 मीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये एप्रिलपासून पाणीटंचाई भासू शकते. पाणीटंचाई भासू लागल्यास तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील सात गावे, धुळे मधील 5, जळगावमधील 16, नंदुरबार जिल्ह्यातील 152 गावे आणि नाशिकमधील 2 गावांचा समावेश आहे, अशी माहिती भुजल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील या तालुक्यांचा समावेश
पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील 4 गावे, बारामतीमधील 2, दौंडमधील 2, हवेलीमधील 20, पुरंदरमधील 19 आणि शिरुरमधील 11 गावांमध्ये पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.