पुणे –शेतीला बसलेला हवामानाचा फटका तसेसच उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक काहीशी कमी होत असल्याने भाजीपाला दरामध्ये चढउतार होत आहे. लिंबाचे उत्पादन कमी झाल्याने तसेच मागणी वाढल्याने एका लिंबाचा दर 15 ते 20 रुपयांवर गेलेला असतानाच येत्या काही दिवसांत आवक घटली तर टोमॅटोचे दरही मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महागाईमुळे सामान्यांचे “किचन बजेट’ कोमडत असतानाच दिवसेंदिवस भाज्या महाग होत आहेत. लिंबाच्या किमतीनंतर आता टोमॅटोच्याही किंमती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुणे कृषि उत्पन्न बाजारात रविवारीपासून (दि.10) टॉमेटोची आवक 11 ते 12 हजार पेटी या प्रमाणात होत आहे. तर, दर 10 किलोला 60 ते 100 रुपयांवर आतातरी स्थिर आहेत. मात्र, हे दर पुढील आठवड्यापर्यंत वाढू शकतात. पुणे बाजारात टोमॅटोची आवक जिल्ह्यासह आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातूनही होत असते. मात्र, टोमॅटो हे नाशिवंत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत तर टोमॅटो फार काळ टिकत नाही, त्यामुळे साठवून ठेवणं शक्य नाही. त्यामुळे टोमॅटोची एकाच वेळी मोठी खरेदी कोणी करत नाही. त्यातच विचीत्र हवामानाचा फटका टोमॅटो पीकला बसला असून काही परिसरात टोमॅटोवर टूटा एब्सलुटा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यातून टोमॅटोचे नुकसान झाल्यास उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यातून आवक कमी होऊन टोमॅटो महागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्याबाहेर किलोचा दर 25 ते 40 रुपये…
महाराष्ट्रात टोमॅटोच्या किंमती अद्याप तरी सामान्यांच्या आवाक्यात असल तरी देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये टोमॅटोच्या किमती वेगवेगळ्या आहेत. सध्या, टोमॅटाचीे 25 रुपये किलोपासून ते 40 रुपये किलोपर्यंत विक्री होत आहेत. टोमॅटोचं उत्पादन कमी झाल्यास या किमती आणखी वाढतील, असे सांगितले जात आहे.