शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांची अनेक प्रकरणे बाहेर काढली. त्यातील एका प्रकरणाने मात्र सोमय्या यांची चांगलीच गोची झालेली सध्या पाहायला मिळत आहे. नौदलाची ऐतिहासिक कामगिरी बजावणारी आयएनएस विक्रांत ही युद्धनौका तिची मुदत संपल्यामुळे भंगारात काढावी लागली आहे, ही ऐतिहासिक स्वरूपाची युद्धनौका असल्याने आणि या नौकेने भारताच्या सागरी सुरक्षेच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावल्याने ती भंगारात काढण्याऐवजी ती जतन करावी आणि त्यावर तिच्या कामगिरीची माहिती देणारे एक कायमस्वरूपी संग्रहालय उभारावे, अशी भन्नाट आयडिया दहा-बारा वर्षांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मांडली होती. त्यांच्या या कल्पनेला अनेकांनी पाठिंबा दिल्यानंतर या कामासाठी मोठ्या प्रमाणात लोकांकडून निधी गोळा करण्यात आला.
हा निधी कोठे गेला, हा साधा प्रश्न किरीट सोमय्या यांना संजय राऊत यांच्याकडून गेले काही दिवस सतत विचारला जात आहे. त्याला कधी थातूरमातूर उत्तरे देऊन तर कधी चक्क प्रश्न टाळून सोमय्या यांनी पळ काढल्याचे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या फूटेजवरून समोर आले आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी रितसर गुन्हाही दाखल केला आहे. तेव्हापासून सोमय्या पिता-पुत्र नॉटरिचेबल झाले आहेत.
ते फरारी झाले असून खोटी कागदपत्रे तयार करून, अटकपूर्व जामिनासाठी ते प्रयत्न करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केला आहे. सोमय्या देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत, असेही राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी काहीही म्हटले असले, तरी या प्रकरणात सोमय्या यांच्याभोवतीचे संशयाचे धुके वाढत चालले आहे, हे मात्र अतिशय स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे या प्रकरणात सोमय्या यांनीच धीटपणे लोकांपुढे येऊन आपले म्हणणे सादर केले पाहिजे. वास्तविक गेले काही दिवस पत्रकारांनी त्यांना या प्रकरणात अनेक प्रश्न विचारले; पण त्यात त्यांची टोलवाटोलवीच दिसून आली आहे. किती पैसे जमले आणि हे पैसे कोठे आहेत हे त्यांनी नीट सांगायला हवे. जर त्यांची बाजू खरी असेल, तर त्याची स्पष्टता त्यांच्याकडूनच झाली तर मग संशयाला जागा उरत नाही. पण या प्रकरणात ते ज्या प्रकारची उत्तरे देत आहेत ते पाहून नक्कीच कुठे तरी पाणी मुरत असावे, अशी शंका घ्यायला जागा मिळते आहे.
मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्या मुंबईहून दिल्लीला गेले. तेथेही पत्रकारांशी त्यांची गाठ पडली. त्यावेळीही पत्रकारांनी त्यांना वरील प्रकारे प्रश्न विचारले होते. त्याला त्यांनी दिलेली उत्तरे मासलेवाईक स्वरूपाचीच होती. किती पैसे जमले या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, मुंबईत पोलिसांनी माझ्या विरोधात मला न विचारता गुन्हा दाखल केला आहे. हे पोलीस उद्धव ठाकरे यांचे आहेत त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे त्यांनीच शोधली पाहिजेत, असे ते एके ठिकाणी म्हणताना दिसले. हे उत्तर काही संयुक्तिक ठरत नाही. नंतर एके ठिकाणी ते म्हणाले की, या प्रकरणात निधी जमवण्याचे काम मी केवळ प्रतिकात्मक स्वरूपात केले. रेल्वे स्टेशनवर पेटी फिरवून इतके पैसे जमत नसतात, असे त्यांनी म्हटले आहे.
विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या यांनी किमान 57 ते 58 कोटी रुपये जमवले आणि नंतर हे पैसे त्यांनी हडप केले, हा राऊत यांचा आरोप आहे. आता ही रक्कम इतकी मोठी नव्हतीच, असे सोमय्या यांनी सांगायला सुरुवात केली आहे. पण सोमय्या यांची येथेही फसगत झाल्याचे त्यांच्याच एका ट्विटर संदेशातून दिसून आले आहे. डिसेंबर 2013 रोजी त्यांनी जो एक ट्विटर संदेश जारी केला आहे त्यात सोमय्या यांनी स्वत:च म्हटले आहे की, विक्रांत वाचवण्यासाठी मुंबईकर 140 कोटी रुपये देण्यास तयार आहेत. म्हणजे तेवढा निधी त्यांनी संकलित केला असावा, असा अर्थ यातून निघू शकतो. या ट्विटरचा दाखला देत राऊत यांनी त्यांना पुन्हा एकदा घेरले. त्यांनी म्हटले आहे की, मी तर केवळ 57 कोटी रुपयेच म्हणालो होतो, पण हा आकडा आता 140 कोटी रुपयांवर गेला आहे. हे पैसे राजभवनला दिले जातील, असे सोमय्या यांनी त्यावेळी म्हटले होते. पण माहितीच्या आधिकारात राजभवनाकडून माहिती मागवली असता एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा राजभवनाकडून जे लेखी उत्तर मिळाले आहे त्यात सोमय्या यांच्याकडून एक रुपयाही जमा झालेला नाही, असे अधिकृत उत्तर मिळाले आहे. त्यामुळे सोमय्या यांची चांगलीच अडचण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
आता जुन्या तारखा टाकून काही कागदपत्रे तयार केली जात असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे. त्याचा खुलासा करण्यासाठी ते कोणासमोरही यायला तयार नाहीत, असे आजचे चित्र आहे. त्यामुळे इतके दिवस महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवून देणारे सोमय्या हेच स्वत: एका भ्रष्टाचार प्रकरणात अडकले असल्याचे जे चित्र निर्माण होत आहे ते त्यांच्या प्रतिमेला साजेसे नाही. ईडीवरील कारवाईच्या विरोधात विरोधकांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर भाजप नेत्यांकडून त्यांना एक नेहमी प्रत्युत्तर दिले जाते की, त्यांची बाजू खरी असेल तर त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, त्यांनी कोर्टात जाऊन ते सिद्ध करावे. मग आता असेच उत्तर सोमय्या यांना देताना राऊत यांनी म्हटले आहे की, जर सोमय्या खरे असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जाऊन पोलिसांपुढे हजर राहिले पाहिजे. भाजपचीच बाजू या निमित्ताने त्यांच्यावर उलटवण्यात राऊत आज यशस्वी ठरले आहेत.
आता वस्तुस्थिती नेमकेपणाने लोकांपुढे ठेवण्याची जबाबदारी सोमय्या यांची आहे. विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली सोमय्या यांनी राज्यातून आणि राज्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणात निधी जमवला होता, याचा इन्कार सोमय्या यांनाही करता आलेला नाही. या मोहिमेसाठी पैसे देणाऱ्यांनीही आता आम्ही यात किती पैसे दिले होते हे उघडपणे सांगायला सुरुवात केली असून एका माजी सैनिकानेच या प्रकरणात सोमय्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली असल्याने सोमय्या यांना यात टोलवाटोलवी करून भागणार नाही. थेट पोलिसांपुढे हजर राहून त्यांनी त्यांची बाजू मांडणे हे अधिक महत्त्वाचे आहे. हा धीटपणा ते दाखवणार की नाही, एवढाच आता यातला महत्त्वाचा भाग आहे.