इम्रान खान यांच्या जागी शाहबाझ शरीफ हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे.
खेळामध्ये कधीही राजकारण आणू नये आणि राजकारणाचा कधीही खेळ करू नये, असे म्हटले जाते. पण एखादा यशस्वी खेळाडू जेव्हा राजकारणाच्या आखाड्यात उतरतो आणि एखाद्या मोठ्या पदावर विराजमान होतो; पण आपण खेळाडू नाही तर राजकारणी आहोत हे विसरून तो जेव्हा वागायला सुरुवात करतो तेव्हा त्या राजकारणाचा कसा खेळखंडोबा होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तानमधील सध्याचे राजकारण. पाकिस्तानी क्रिकेटचा दीर्घकाळ अविभाज्य भाग असणारे ऑल राउंडर इम्रान खान यांनी राजकारणाच्या मैदानात उडी घेतल्यानंतर थेट पंतप्रधान पदावरही झेप घेतली होती; पण ही झेप त्यांना पचली नाही आणि अडीच-तीन वर्षांत हे पद सोडावे लागले.
“मी एक क्रिकेटपटू आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानणार नाही’, अशी वल्गना जरी इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी केली असली, तरी प्रत्यक्षात पाकिस्तानच्या संसदेला तोंड न दाखवताच त्यांनी हार मानली आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे अधिकृत निवासस्थानही सोडले. इम्रान खान यांना या पदावरून बाजूला केल्यानंतर पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाचे नेते शाहबाझ शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनले आहेत.
इम्रान खान यांना बाजूला केल्यामुळे पाकिस्तानच्या सर्व समस्या सुटल्या असे म्हणता येत नाही. कारण पाकिस्तानच्या लोकशाहीची अशी कसोटी नेहमीच पाहिली जाते, असा आजवरचा अनुभव आहे. इतर सर्व विरोधी पक्षांच्या सहकार्यामुळेच जरी शाहबाझ शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले असले तरी त्यांच्या किंवा पाकिस्तानच्या समस्या कायमच्या सुटतील अशी कोणतीही आशा सध्या दिसत नाही. पाकिस्तानच्या कोणत्याही पंतप्रधानाने आतापर्यंत पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केलेली नाही. हा इतिहास बघता आणि शाहबाझ शरीफ यांना फक्त उर्वरित दोन-अडीच वर्षांची कारकीर्द पूर्ण करावी लागणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल.
इम्रान खान यांना त्यांच्या पदावरून बाजूला करण्यासाठी पाकिस्तानमधील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते आणि त्यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) गटाचे नेते शाहबाझ शरीफ यांचे नेतृत्वही मान्य केले आहे. इम्रान खान यांना बाजूला करणे हा या सर्व विरोधी पक्षांचा किमान समान कार्यक्रम होता. शाहबाझ शरीफ यांच्यासाठी मात्र ही वैयक्तिक लढाई होती. त्यांचे बंधू आणि पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर तब्बल तीन वेळा विराजमान झालेले नवाझ शरीफ यांना ज्या प्रकारे सत्तेवरून बाजूला करण्यात आले होते आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना परागंदा व्हावे लागले होते ती गोष्ट शाहबाझ यांना लागल्यामुळे नवाझ शरीफ यांना पुन्हा एकदा मानाने पाकिस्तानात परत आणायचे आहे. या एकाच वैयक्तिक हेतूने त्यांनी पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांना बाजूला करण्यासाठी रणनीती आखली होती आणि ती रणनीती यशस्वी झाली, असेच म्हणावे लागेल.
पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या पंजाब या प्रांताचे तब्बल दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेले शाहबाझ शरीफ यांना निश्चितच पाकिस्तानच्या राजकारणाची जाण आहे आणि जाणीवही आहे. म्हणूनच सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून इम्रान खान यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची रणनीती रचली होती. स्वतः जलदगती गोलंदाज असूनही इम्रान खान यांनी गूगली टाकण्याचा प्रयत्न करून संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता आणि देशात पुन्हा एकदा निवडणुका व्हाव्यात असे सुचवले होते; पण पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने प्रथमच कणखर भूमिका घेऊन इम्रान खान यांचा हा निर्णय रद्दबातल ठरवून इम्रान यांनी अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे, असा आदेश दिला होता. पण पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये आपल्याला बहुमत नाही याची जाणीव असल्यानेच इम्रान नॅशनल असेंब्लीला सामोरे गेले नाहीत आणि त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव संमत होऊ शकला. सोमवारी झालेल्या नॅशनल असेंब्लीच्या अधिवेशनामध्ये अधिकृतपणे शाहबाझ यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आणि पाकिस्तानमध्ये एका नव्या पंतप्रधान पदाची कारकीर्द सुरू झाली.
आजवरचा इतिहास पाहता लष्कराला आणि आयएसआयला बाजूला ठेवून तुम्हाला पाकिस्तानमध्ये सत्ता राबवता येत नाही, हे पुन्हा एकदा इम्रान खान यांच्या उदाहरणावरून समोर आले आहे. शाहबाझ शरीफ यांनाही लष्कर आणि आयएसआय यांना योग्य महत्त्व देऊनच आपली कारकीर्द चालवावी लागणार आहे. इम्रान खान पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर लष्कराने काही प्रमाणात पाकिस्तानी राजकारणातले आपले लक्ष कमी केल्याचे भासवले असले, तरी पाकिस्तानची लोकशाही संपूर्णपणे लष्कराच्याच ताब्यात आहे हे लपून राहिलेले नाही. लष्कर आणि आयएसआय यांच्यासोबत जेव्हा इम्रान खान यांचे मतभेद सुरू झाले तेव्हा इम्रान यांना पदावरून हटवण्याची रणनीती आखायला सुरुवात झाली होती, ही गोष्ट शाहबाज शरीफ यांना माहीत नसेल, असे नाही. पाकिस्तानच्या मतदारांनी मोठ्या विश्वासाने इम्रान खान यांच्या हातात सत्ता दिली होती; पण त्यांनी या सत्तेकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही, असेच दिसते. खेळाचे मैदान आणि राजकीय आखाडा यामधील फरक इम्रान खान यांना कधीच समजला नाही. पंतप्रधान पदावर आल्यावर त्यांनी फक्त “नया पाकिस्तान’ या शब्दाची घोषणा केली; पण गेल्या तीन वर्षांमध्ये पाकिस्तानची परिस्थिती ढासळतच चालली होती.
दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून दहा वर्षे सत्तेवर राहिलेल्या शाहबाझ शरीफ यांनी मात्र विविध योजना पंजाबमध्ये राबवून पंजाबचा कायापालट केल्याचे उदाहरण मतदारांसमोर होते तेच शरीफ आता पाकिस्तानचे पंतप्रधान बनले असल्याने पाकिस्तानचे नागरिकही शरीफ यांची कारकीर्द कशी असेल हे पाहण्यास उत्सुक असतील. अर्थात, पूर्णपणे लष्करी पाठिंब्यावर पोसलेल्या पाकिस्तानच्या लोकशाहीच्या कसोटीचा काळ कधीच संपत नाही, असे आजपर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. पाकिस्तानच्या लोकशाहीचे पावित्र्य जपतानाच लष्कर आणि आयएसआय यांनाही नाराज न करण्याचे धोरण आता शरीफ यांना राबवावे लागणार आहे.
इम्रान खान यांची पंतप्रधानपदाची खुर्ची गेली असली, तरी पाकिस्तानमधील एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आणखी दोन-अडीच वर्षांनी पुन्हा एकदा निवडणुका होतील तेव्हा इम्रान खान यांच्या पक्षाला संधी उपलब्ध होऊ शकते. पण त्यासाठी इम्रान खान यांना क्रिकेटचे मैदान आणि राजकीय आखाडा यामधील फरक गांभीर्याने समजून घ्यावा लागणार आहे.
क्रिकेटच्या मैदानात जगातील प्रमुख ऑलराउंडर म्हणून इम्रान खान यांच्यावर शिक्का बसला होता, तरी राजकारणामध्ये मात्र त्यांचे अष्टपैलुत्व कमी पडले. आता पुढची इनिंग शाहबाझ शरीफ खेळणार आहेत.
मुकुंद फडके