नागपूर – शिवसेनेचे विदर्भात संपर्क अभियान सुरू असतानाच या भागाला राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत संजय राऊत यांनी संकेत दिले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे दोन बडे नेते भारतीय जनता पार्टीचे नागपुरातून प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे या जिल्ह्यातून मंत्रीपद देण्याची शिवसेनेकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
संजय राठोड यांच्यानंतर विदर्भात सेनेचा एकही मंत्री नाही. त्यामुळे पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते याची चर्चा सुरू झाली आहे. संसदेचे अधिवेशन सुरु असताना ते सोडून शिवसेनेचे सर्व खासदार शिवसंपर्क अभियानात आलेत. आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार आहे. विदर्भ भाजपचा गढ आहे. त्याच विदर्भात शिवसेनेची ताकद वाढवायची आहे.
आतापर्यंत युतीत विदर्भात भाजप जास्त जागा लढवत असल्याने शिवसेनेची ताकद कमी राहिली. विदर्भात सेनेचे चार आमदार, तीन खासदार आहेत. चार आमदारांपैकी एका आमदाराचे मंत्रीपद गेले. आता तीन आमदारांपैकी कुणाला मंत्रीपद मिळते याची उत्कंठा आहे. शिवसेनेत वाद होते. पण, संजय राऊत नागपुरात आले.
तीन दिवस त्यांनी मुक्काम ठोकला. नागपुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यामुळे आता पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. विदर्भाच्या वाट्याला एखादे प्रतिनिधित्व म्हणून मंत्रीमंडळात स्थान मिळावे, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर विचार करू. विदर्भाला प्रतिनिधीत्व देऊ, असे आश्वासन राऊत यांनी दिले असल्याचे वृत्त आहे.