पुणे –मुठा नदीपात्रात पाण्यास अडथळा निर्माण झाल्याने साठून राहणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढत आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच पालिकेने तब्बल 1 कोटी रुपयांची निविदा काढली असली तरी अद्याप जलपर्णी काढण्यास ठेकेदारास वेळ मिळालेला नसल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे ही जलपर्णी वेगाने वाढत असल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांना डासांचा तसेच पाण्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुठा नदीत वारजे पूल परिसर, राजारामपूल, संगमपूल, बंडगार्डन आणि मुंढवा जॅकवेलच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढत आहे. त्यात, राजारामपूल आणि संगमवाडी येथे मेट्रोच्या कामासाठी नदीतच भराव घातल्याने या ठिकाणी जलपर्णी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ती काढण्यासाठी या भागात स्पायडर मशीन वापरून ती काढणे शक्य आहे. मात्र, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून ती वाहून जाण्याची वाट पाहिली जात आहे. विशेष म्हणजे याबाबत पालिका प्रशासनाकडे चौकशी केली असता जलपर्णी काढण्यासाठी मशीन उभी करण्यास जागा नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासापेक्षा ठेकेदाराची होणारी गैरसोयीची प्रशासनाला चिंता असल्याने पालिकेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केला
जात आहे.
जलपर्णी वाढल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यानुसार, त्या तातडीने मशीनने काढून घ्यावी, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. – डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका