मुंबई : देशात गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये भाजपने विजय मिळवल्यानंतर राज्यात देखील आत्तापासूनच निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. भाजपने २०२४ मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना दुसरीकडे एमआयएमने महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले,’औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे आणि राज्यातल्या कोणत्याही पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही. ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे ती त्यांना लखलाभ ठरो.’
ते पुढे म्हणाले,’एमआयएम आणि भाजपाची छुपी युती आहे हे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे. एमआयएम भाजपाची बी टीम असल्याचे आम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिले आहे. जर त्यांना उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव करायचा होता तर त्यांनी खूप काळजीपूर्वक पावले टाकायला पाहिजे होती.’ अस म्हणत राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.