मुंबई – पोलीस दलात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 12 हजार 500 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 7231 पदांसाठीची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहती गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
विधानपरिषदेत नियम 260 अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था विषयक प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते. देसाई म्हणाले, राज्यातील आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस दलावर करोनाच्या काळात कामाचा ताण पहायला मिळाला. करोनामुळे पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी बाधित झाले.
करोना काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोलीस दलाने अत्यंत चांगले काम केले आहे. पोलीस दलावरील मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी महिलांना आठ तास ड्युटी करण्यात आली असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर देणार आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगली घरे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणजे 2019-2020 मध्ये पोलीस दलाला घरकुलासाठी 250 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले.
2020-21 मध्ये 400 कोटी रुपये, 2021-2022 मध्ये 800 कोटी तर 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोलिसांसाठीच्या घरांसाठीची तरतूद एक हजार कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे, असेही देसाई यांनी सांगितले.