जौनपूर -“डिएनए’मध्ये सेवा मूल्य असलेल्या उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आड उत्तर प्रदेशातील मतदारांना केले. 10 मार्च रोजी उत्तर प्रदेशात भाजपचे राज्य पुन्हा एकदा स्थापन झाले की जे एक – दोन गॅंगस्टर आता तुरुंगाबाहेर आहे, त्यांनाही तुरुंगात टाकले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मल्हानी विधानसभा मतदार संघात आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.
या वेळच्या निवडणुकीत गावगुंडांना विजयी होऊ देऊ नका. ज्या उमेदवाराच्या डिएनएमध्ये सेवेचे मूल्य आहे, अशाच उमेदवाराला विजयी करा, ज्याला हिसकावून घ्यायचे नाही, आणि द्यायचे आहे, अशाची निवड करावी. जो कोणाला मारत नाही, पण जो इतरांना मारतो अशाला तुरुंगात पाठवतो, अशाची निवड करावी, असे आवाहनही शहा यांनी केले.
उत्तर प्रदेशला माफियामुक्त केले जाईल, असे आश्वासन 2017 च्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्यावेळी भाजपने दिले होते. त्यानुसार गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीला राजकारणातून निपटून काढण्याचे आणि राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला संपवण्याचे काम भाजपने केले आहे, असे शहा म्हणाले.