नरहरी झिरवळ ः भीमाशंकरला आदिवासी समाज प्रबोधन महामेळावा
मंचर – शिक्षणाची प्रणाली बदलण्याची गरज आहे. व्यावसायिक शिक्षण घेणे आता गरजेचे असून, नोकरीपेक्षा उद्योगधंद्यातही आदिवासी पुढे आले पाहिजेत, असे मत विधानसभेचे उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे बिरसा ब्रिगेड वर्धापन दिनानिमित्त आदिवासी समाज प्रबोधन महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी एकात्मिक प्रकल्प अध्यक्ष सुभाष मोरमारे, सभापती संजय गवारी, प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, बिरसा ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम, जिल्हा परीषद सदस्या रुपाली जगदाळे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, सह्याद्री सातपुडा महाअध्यक्ष शशिकांत करवंदे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी, आदिवासी विचार मंच अध्यक्ष प्रदीप पारधी, मारुती लोहकरे, विजय आढारी, भीमाशंकर सरपंच दत्तात्रय हिले उपस्थित होते. यावेळी आदिवासी जमिनीबाबत होन्या केंगले यांचे स्मृतिस्थळ आंबेगाव तालुक्यात उभारावे, आदी मागण्या यावेळी प्रास्ताविकात प्रवीण पारधी यांनी मांडल्या.
बिरसा ब्रिगेड संघटनेने शिक्षण, समाजाचा विकास, रोजगार यावर लक्ष दिले पाहिजे. भीमाशंकर ज्योर्तिलिंगाचा शोध आदिवासींनी लावला; पण अचानक इतिहास बदलला आणि बलुतेदारांकडे भीमाशंकरचा ताबा गेला. या ट्रस्टचा अध्यक्ष आदिवासी असावा. मंदिराचे व्यवस्थापन आदिवासींकडे असावे. भीमाशंकर संघर्ष समितीच्या पाठीशी बिरसा बिग्रेड आहे.
सुभाष मोरमारे, अध्यक्ष, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
आदिवासी समाज आरक्षणाने उभा राहणार नाही, स्वसंरक्षणाने उभा राहणार आहे. भीमाशंकर मंदिर, जमीन व त्यावर हक्क आदिवासींचा आहे; पण सध्या आदिवासींवरच अन्याय होत आहे.
– सतीश पेंदाम, राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा ब्रिगेड