हैदराबाद – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे केंद्रीय अर्थसंकल्पावरून भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर चांगलेच भडकले असून भाजपला बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची वेळ आली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीच दीर्घदृष्टी नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भाजपला देश चालवता येत नाही, या देशासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते आम्ही करू. ही लोकशाही आहे आम्हाला आता शांत बसून चालणार नाही. देशात आता विधायक बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्यासाठी आता राष्ट्रीय स्तरावर हालचाली करण्याची गरज असून मी स्वता आता मुंबईत जाऊन शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
देशात जेव्हा काहीं विपरीत घडते त्यावेळी त्यावर प्रतिक्रीया देण्याची क्षमता या देशात आहे. त्यानुसार देशातील जनता बदल घडवेल त्यासाठी आता कसून प्रयत्न हाती घेण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की आज सिंगापुरकडे काहीही नाही पण त्यांना मेंदु आहे, आपल्या देशात सर्व काही आहे पण सत्ताधारी भाजपला मेंदुच नाही.
ते म्हणाले की घटनेची तत्वे मजबूत करण्यासाठी आता नव्याने घटना लिहीण्याची गरज असून नयी सोच नया देश हे तत्व लक्षात घेऊन नव्याने घटना लिहावी लागेल असेही मत त्यांनी व्यक्त केले. भाजपने लोकांची घोर फसवणूक केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या पोषाखावरूनही त्यांनी मोदींवर निशाणा साधला ते म्हणाले की त्यांचा पोषाख म्हणजे उपर शेरवानी अंदर परेशानी स्वरूपाचा आहे.