नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे मुलींचे अस्तित्व, सुरक्षितता आणि शिक्षण सुनिश्चित केले जाणार होते. या योजनेच्या माध्यमातून लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र या योजनेसंदर्भातील नवीन आकडेवारी समोर आली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितलं की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, योजनेसाठी देण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी ५८ टक्के रक्कम ही केवळ प्रचारासाठी अर्थात जाहिरातींसाठी खर्च करण्यात आली आहे.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं की, “बेटी बचाओ, बेटी पढाओ, योजनेतर्गंत २०१४ पासून २०२१ पर्यंत ६८३.०५ करोड रुपये खर्च करण्यात आले आहे. ज्यामधील ४०१.०४ करोड रुपये अर्थात ५८ टक्के रक्कम ही केवळ जाहिरातीसाठी वापरण्यात आली आहे.
“बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचे ध्येय बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण आणि महिला व मुलींचे सक्षमीकरण, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील समस्यांचे निराकरण करणे, लिंग तपासणी करण्यावर रोख लावणे होतं, असं इराणी यांनी सांगितलं.