शिक्रापूर – लग्नाहून चाललेल्यांना काळ ओढवला आहे. शिक्रापूर येथे चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे तर सहाजण जखमी झाले आहेत. ही घटना शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गावर घडली. मृतांमध्ये एका दाम्पत्याचा समावेश आहे. लिना राजू निकशे (वय 18, रा. दांडेकर पूल, पुणे), स्वप्नील पंडित केंदळे (रा. कांदिवली, मुंबई), विठ्ठल पोपट हिंगडे व रेश्मा विठ्ठल हिंगडे (दोघे रा. वासुंडे, ता. पारनेर) अशी मृत्यू झालेलल्यांची नावे आहेत.
तर राजू सीताराम निकशे (वय 45), आशा राजू निकशे (वय 40), तेजस राजू निकशे (वय 21, तिघे रा. दांडेकर पूल, पुणे), सिद्धार्थ संजय केंदळे (वय 18, रा. धायरी, पुणे), सागर अनिल पटेकर (वय 21, रा. सरदवाडी, ता. शिरुर), रोहन उत्तम बारवेकर (वय 21, रा. न्हावरे, ता. शिरुर) हे जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी, शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गावरून पुणे बाजूने ट्रक (एमएच 12 डीजी 9657) हा ट्रक चाललेला असताना अचानक दुभाजकावरून अहमदनगर बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनावर (एमएच 12 आरके 1217) आदळला. तेथेच न थांबता हा ट्रक पाठीमागून येत असलेल्या दोन दुचाकींना (एमएच 12 टीजी 9351 व एमएच 12 आरएल 4050) चिरडून रस्त्याचे कडेला असलेल्या भिंतीवर जाऊन आदळला.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, अमोल खटावकर, पोलीस हवालदार शंकर साळुंके, पोलीस नाईक भास्कर बुधवंत, राकेश मळेकर अंबादास थोरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान येथील नागरिकांनी जखमींना तातडीने येथील सूर्या हॉस्पिटल व रक्षक हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले. अपघात घडताच ट्रक चालक ट्रक रस्त्याचे कडेला सोडून पळून गेला आहे.