राज्यातील 42 टक्के वनक्षेत्र वणवाप्रवण
पुणे – राज्यातील वणव्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. तसेच, महाराष्ट्र वणव्यांचे प्रमाण जास्त असणारे देशातील चौथे राज्य असल्याची नोंद भारतीय वनसर्वेक्षण संस्थेने घेतली आहे. राज्यातील तब्बल 42 टक्के वनक्षेत्र हे वणव्यांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असून, विशेषत: पश्चिम घाटात याचा धोका सर्वाधिक आहे.
भारतीय वनसर्वेक्षण संस्थेतर्फे नुकताच वनांची सद्य:स्थिती 2021 हा अहवाल प्रकाशित केला. यात नोव्हेंबर 2020 ते जून 2021 या कालवधीत घेण्यात आलेल्या वणव्यांच्या नोंदीबाबत माहिती देण्यात आली. संस्थेतर्फे “नासा’ या अंतराळ संस्थेच्या “ऍक्वा’ आणि “टेरा’ या सॅटेलाइटच्या सहाय्याने “मॉडरेट इमेजिंग स्पेक्ट्रो रेडिओमीटर’ (मोडीस) या प्रकारातील तसेच “सौमी नॅशनल पोलर-ऑरबिटिंग पाटर्नरशिप- विजिबल इन्फ्रारेड इमेजिंग रेडिओमीटर सूट’ (एनएनपीपी-व्हीआयआयआरएस) या प्रणालीच्या सहाय्याने देशाच्या विविध भागांमधील वणव्यांच्या नोंदी घेतल्या जातात. यामध्ये वनक्षेत्र तसेच वनेत्तर क्षेत्रांचाही समावेश आहे.
अहवालानुसार, नोव्हेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीत राज्यात 34,025 वणव्यांची नोंद घेतली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 10,577 वणव्यांची नोंद घेण्यात आली आहे. त्याचबरोबर मानवी चूकांमुळे लागलेली आग हे वणव्याचे प्रमुख कारण असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे. वणव्यांमुळे जैवविविधता आणि मानवी जीवनावर होणाऱ्या परिणांमध्ये जैवविविधता आणि अधिवास नष्ट होणे, उत्पादन आणि उत्पादकतेवरील परिणाम तसेच जंगलावर आधारित उपजीविकेत व्यत्यय यांचा समावेश आहे.
पुण्यातील वनसंपदेलाही वणव्याच्या झळा
पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील वनसंपदेलाही वणव्याच्या झळा बसतात. शहर परिसरातील टेकडीवर, वनांमध्ये फिरायला जाणारे नागरिक जळत असलेली सिगारेट, विडी रानावनात भिरकावतात. तर काही लोक रात्री शेकोटी पेटवतात. तर काही जणांकडून मुद्दामहून आग लावली जाते. त्यामुळेच वणवा पेटण्याच्या घटना घडतात.
हा प्रकार टाळण्यासाठी वनविभागाकडून फायरलाइन आखण्यासारखे प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. तसेच विविध शासकीय विभाग, विविध संस्थांचे प्रतिनिधी, टेकडी संवर्धन करणारे ग्रुप, टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या तरुणांना एकत्र आणत त्यांचे प्रबोधन विभागातर्फे करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली आहे.