मुंबई – भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीचा शेअर 2 टक्क्यानी कमी झाला. त्याचबरोबर इतर काही बड्या कंपन्या पिछाडीवर असल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात माफक घट झाली असल्याचे दिसून आले.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 12 अंकांनी कमी होऊन 57,794 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 9 अंकांनी कमी होऊन 17,203 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स कंपनीबरोबरच टाटा स्टील, मारुती, बजाज फायनान्स, सन फार्मा, स्टेट बॅंक या कंपन्यच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. तर एनटीपीसी, एचसीएल टेक्, इंडसइंड बॅंक, टायटन, विप्रो या कंपन्याच्या शेअरच्या भावात थोडी फार वाढ झाली.
जागतीक बाजारातून आज संमिश्र संकेत आल्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठे निर्णय घेतले नसल्याचे दिसून आले. दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 975 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली असल्याची माहीती शेअर बाजारानी जारी केली. आतापर्यंत तरी गुंतवणूकदारांनी ओमायक्रॉनच्या वाढणाऱ्या संसर्गाकडे दूर्लक्ष केले आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी निर्बंध घातले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांचे बदलणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष राहणार आहे.
आयटी क्षेत्र तेजीत
रुपयाचे मुल्य सध्या कमी पातळीवर आहे. त्यामुळे निर्यात करणाऱ्या आयटी कंपन्या तेजीत आहेत. आजही आयटी कंपन्याचे शेअर वधारले. विप्रोचा शेअर दिड टक्क्यानी, टिसीएसचा शेअर 1.2 टक्क्यानी, इन्फोसीस कंपनीचा शेअर 0.5 टक्क्यानी, एचसीएल टेकनालॉजीचा शेअर 2 टक्क्यानी वाढला.
आता या कंपन्या आपले तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात या कंपन्याकडे गुंवणूकदारांचा ओढा राहण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांना वाटते. या क्षेत्रातील मध्यम कंपन्या जास्त तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.