नवी दिल्ली – श्रीलंकेने केवळ 3 दिवसांत तब्बल 68 भारतीय मच्छिमारांना अटक केली. भारताने त्या कुरापतींची गंभीर दखल घेऊन मच्छिमारांची लवकरात लवकर सुटका करण्याची सूचना श्रीलंकेला केली.
श्रीलंकन नौदलाने 18 ते 20 डिसेंबर या कालावधीत तामीळनाडूचे रहिवासी असणाऱ्या 68 मच्छिमारांना पकडले. त्यांच्या 10 नौकाही ताब्यात घेण्यात आल्या. त्याबाबतची माहिती मिळताच कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयाने श्रीलंकन सरकारशी संपर्क साधला. तसेच, भारतीय मच्छिमारांच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला.
एवढेच नव्हे तर, भारतीय अधिकाऱ्यांनी श्रीलंकन नौदलाने अटक केलेल्या मच्छिमारांची भेट घेऊन त्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याची व्यवस्था केली. श्रीलंकन सागरी हद्दीत शिरकाव केल्याचा ठपका ठेऊन त्या देशाचे नौदल अनेकदा भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेते. त्यांच्यावर श्रीलंकन नौदलाने हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
त्या घडामोडींमुळे तामीळनाडूतील वातावरण ढवळून तेथील राजकारणही तापलेले दिसते. त्यातून मच्छिमारांना श्रीलंकन नौदलाकडून त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी वारंवार तामीळनाडूतील राजकीय पक्षांकडून केली जाते.