रांजणगाव गणपती-कांदा पिकाचे पंचनामे करा, वीज बिलात सवलत द्यावी. मृत मेंढ्यांच्या मालकांना मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी व कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथे अवकाळीच्या पावसात गारठून मृत्यू झालेल्या मेंढ्यांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे वीजबील भरण्यासाठी मुदत वाढीची मागणी व वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून करण्यात येईल, असे आढळराव यांनी सांगितले.
शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे गुरुवारी मध्यरात्री 77 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. अजूनही काही मेंढ्या अत्यवस्थ अवस्थेत असून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिरूर तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला. या संकटाने मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिरुर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु झाल्याने मेंढ्या गारठल्या. मेंढपाळांनी शेकोटी पेटवून मेंढ्यांना ऊब देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. मेंढ्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पिंपरी दुमाला येथे काही मेंढपाळांच्या मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याची माहिती पिंपरी दुमाला शिवसेनेचे शाखाप्रमुख विलास मासाळकर यांनी शिवसेनेचे युवा नेते शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत थोरात यांना फोनद्वारे दिली.
थोरात यांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आढळराव पाटील यांना त्वरित फोन करून पंचनामा करून देण्याची मागणी केली. आढळराव पाटील यांनी तात्काळ शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना फोन करून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने पंचानामा तात्काळ केला. शासकीय मदत लवकरच संबंधित मेंढपाळ बांधवांना शिवसेनेच्या वतीने पाठपुरावा करून देण्यात येईल. असेही आढळराव यांनी सांगितले.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपटराव शेलार, शिवसेना सल्लागार अनिल काशीद, शेतकरी सेना उपजिल्हाप्रमुख भरत थोरात, शिरुर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय देशमुख, शिवसेना विभाग प्रमुख विशाल सोनवणे, शिवसेना शाखाप्रमुख विलास मासाळकर, उपसरपंच माणिक मासाळकर, ग्रामपंचायत सदस्य शरद खळदकर, सुनील सोनवणे, भरत खेडकर, ईश्वर बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.