मुंबई – महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. येत्या काळात तो भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू बनेल, अशा शब्दात विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी या नवोदित फलंदाजाचे कौतुक केले आहे. ऋतुराजकडे उत्तम क्षमता आहे. भविष्यात तो तीनही क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल, असेही मत गावसकरांनी व्यक्त केले आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील आव्हान संपल्यावर आता भारतीय संघ मायदेशी परतला असून आता घरच्या मैदानातून नव्याने सुरुवात करणार आहे. रोहित शर्माचे नेतृत्व आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून नव्या शिलेदारांसह रोहित शर्मा मैदानात उतरेल.
बीसीसीआय निवड समितीने अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली असून यात आयपीएल स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खान हे त्रिकूटाची पहिल्यांदाच भारतीय संघात वर्णी लागली आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप पटकवणाऱ्या ऋतूराज गायकवाडचाही समावेश आहे. ऋतुराजकडे उत्तम क्षमता आहे. भविष्यात तो तीनही क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल, असे मत गावसकरांनी व्यक्त केले आहे.
ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना स्पर्धेत 635 धावा केल्या होत्या. ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या ऋतूराज आगामी स्पर्धेत कोणत्या स्थानावर खेळण्याची संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय संघ येत्या बुधवारपासून न्यूझीलंड विरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी ही मालिका महत्वाची ठरणार आहे.