दुबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारत व पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. आता हे दोन संघ पुन्हा कधी एकमेकांसमोर येणार याची उत्कंठा चाहत्यांना लाहगली होती. आता पुढील वर्षी श्रीलंकेत आशिया करंडक स्पर्धा होत असून त्यातही चाहत्यांना भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याची मेजवानी पाहायला मिळणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत झालेल्या सामन्यात पहिल्यांदाच भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेनंतर विराट कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडले होते. आता संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले असून त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
पुढील वर्षीची टी-20 आशिया करंडक स्पर्धा सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होणार आहे. आशिया खंडातील सर्व संघ स्पर्धेत प्रवेश करतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत श्रीलंकेला यजमानपद देण्यात आले. 2023 साली आशिया करंडक पाकिस्तानमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 50 षटकांची होणार असून पाकिस्तानमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ जाणार का हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुढील वर्षी टी-20 आशिया करंडक स्पर्धेसह टी-20 विश्वकरंडक स्पर्धाही होणार आहे. ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. यामध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.