फेसबुक आपल्या सर्वांच्याच जगण्याचा अविभाज्य घटक बनलं आहे. आजकालच्या या धावपळीच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींच्या आयुष्यातील अपडेट्सपासून ते जगभरातील घडामोडींबाबत जाणून घेण्यासाठी फेसबुक हे एक अत्यंत उपयुक्त माध्यम ठरताना दिसतंय. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचे असे अनेक फायदे सांगता येतील. मात्र या फायद्यांसोबतच फेसबुकचा एक सर्वात मोठा तोटा असून तो म्हणजे याच्या अतिवापरामुळे एकाग्रतेचा होणारा भंग!
जगाच्या पाठीवरील अनेक लोक फेसबुकमुळे एकाग्रतेने काम करता येत नाही, टाईम पास होतो, प्रॉडक्टिव्हिटी कमी होते अशा तक्रारी करताना दिसतात. अनेक अभ्यासांमधून देखील फेसबुकचा अथवा तत्सम सोशल मीडियाच्या अति वापरामुळे एकाग्रता भंग पावणे, चिडचिड होणे असे दुष्परिणाम होत असल्याचे निष्कर्ष वेळोवेळी मांडले आहेत. फेसबुक व इतर सोशल मीडियाचा वापर कमी करणे हाच या समस्येवरचा एकमेव उपाय सांगितला जातो. तर मनावर ताबा राहत नसल्याने ते शक्य होत नसल्याचं या समस्येने ग्रस्त असलेले सांगत असतात.
मात्र एका अमेरिकास्थित भारतीय उद्योजकाने या समस्येवर ९ वर्षांपूर्वीच ‘जालीम’ उपाय शोधून काढला होता. मनीष सेठी असं या पठ्ठ्याचं नाव असून त्यांनी चक्क कामाच्या वेळेत फेसबुक उघडल्यास कानाखाली जाळ काढण्यासाठी एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती केली होती.
एका खासगी कंपनीचे मालक असलेल्या सेठी यांनी कारा नावाच्या एका माहिलेले आपल्या कंपनीत नौकरी देत त्यांनी (स्वतः सेठी यांनी) कामाच्या वेळेत फेसबुक उघडल्यास त्यांच्या कानाखाली ‘जाळ’ काढण्याची जबाबदारी त्या महिला कर्मचाऱ्यांकडे सोपवली होती.
याबाबचा एक फोटो आता ९ वर्षांनंतर समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून यात कारा मॅडम आपले बॉस मनीष सेठी यांच्या बाजूला बसून कानशिलात लगावताना दिसतायेत.
दरम्यान, फेसबुकचा वापर कमी करण्यासाठी सेठी यांनी त्यावेळी राबवलेल्या अभिनव उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी देखील फेसबुकचा वापर कमी करण्यासाठी सेठी यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
सेठी यांनी तब्बल ९ वर्षांपूर्वी फेसबुकमुळे होणाऱ्या एकाग्रता भंग समस्येतून सुटका करून घेण्यासाठी ही शक्कल लढवली होती. मात्र एलॉन मास्क यांनी हा व्हिडीओ पुन्हा शेअर केल्याने इंटरनेटच्या विश्वामध्ये पुन्हा एकदा याची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळतंय.