लखनौ – आयपीएल स्टार व महाराष्ट्राचा अव्वल फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने ओडिशावर 27 धावांनी सहज मात केली.
ऋतुराजने 47 चेंडूत 81 धावांची खेळी करताना या स्पर्धेत सलग तिसऱ्या अर्धशतकाची नोंद केली. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना 20 षटकांत 8 बाद 183 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
ऋतुराजला साथ देताना केदार जाधवने 35 चेंडूंत 55 धावांची खेळी केली व दुसऱ्या गड्यासाठी 131 धावांची भागीदारी रचली. ओडिशाचा डाव 18.5 षटकांत 156 धावांवर संपला. अंशाय रथने 34 आणि अभिषेक राऊतने 29 धावा केल्या. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. महाराष्ट्राचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज दिव्यांग हिंगणेकरने 35 धावांत 4 बळी घेतले, तर आशय पालकरने 13 धावांत 3 बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : 20 षटकांत 8 बाद 183 धावा. (ऋतुराज गायकवाड 81, केदार जाधव 55. देवव्रत प्रधान 3-37) विजयी वि. ओडिशा – 18.5 षटकांत सर्वबाद 156 धावा. (अंशाय रथने 34, अभिषेक राऊत 29, दिव्यांग हिंगणेकर 4-35, आशय पालकर 3-13)