मुंबई –आखातात सुरू असलेल्या विश्वकरंडक टी-20 स्पर्धा संपल्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार संपुष्टात येणार आहे. शास्त्री यांच्यानंतर माजी कर्णधार राहुल द्रवीड भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेणार आहे.
करार संपल्यावर शास्त्री समालोचन करणार की आयपीएल स्पर्धेतील एखाद्या संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होणार याबाबत अनेकांना प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, समालोचनापेक्षा ते आयपीएल स्पर्धेतील एका संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, प्रशिक्षक म्हणून करार केवळ आयपीएल स्पर्धेच्या कालावधीत असणार असल्याने उर्वरित कालावधीत ते समालोचक म्हणून काम करतील. पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेपासून दोन नवे संघ सहभागी होणार असून त्यातील अहमदाबाद संघाकडून शास्त्रींना विचारणाही झाल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, त्यांनी अद्याप याबाबत आपले मत व्यक्त केलेले नाही. शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण तसेच गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधर देखील अहमदाबाद संघाशी जोडले जाण्याची शक्यता व्यक्त केली केली जात आहे.