दुबई – जाडेजा,शमी आणि बुमराह यांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतर फलंदाजीत केएल राहुलने लगावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने स्कॉटलंडवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. रविंद्र जाडेजा विजयाचा शिल्पकार ठरला.
विजयासाठी आवश्यक 86 धावांचा पाठलाग करताना भारताने अफलातून फटकेबाजी केली आणि केवळ 6.3 षटकांत 2 बाद 89 धावा करत विजय साकारला. भारताकडून सलामीवीर राहुलने धडाकेबाज फलंदाजी करत 19 चेंडूत 50 केल्या. राहुलने केवळ 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. रोहित शर्माने 16 चेंडूत 30 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहलीने नाबाद 2 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 6 धावा करत भारतास विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधार कोहलीचा हा निर्णय सार्थ ठरवत स्कॉटलंड संघास 17.4 षटकांत अवघ्या 85 धावांवर रोखले. त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ 86 धावांचे आव्हान मिळाले.
स्काॅटलंडकडून फलंदाजीत सलामीवीर जॉर्ड मुन्सीने सर्वाधिक 24 त्यापाठोपाठ मायकेल लीस्कने 21, कॅलम मॅकलिओडने 16 आणि मार्क वॉटने 14 धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत जडेजाने 4 षटकांत 15 धावा देताना 3 गडी बाद केले. शमीनेही 3 षटकांत 15 धावा देत 3 गडी बाद केले. बुमराहने 3.4 षटकांत 10 धावा देत 2 गडी तर आर आश्विनने 4 षटकांत 29 धावा देत 1 गडी बाद केला.