मुंबई – राज्यातील एक मंत्री नवाब मलिक यांनी माझ्या कुटुंबीयांविषयीची चुकीची माहिती सोशल मीडियातून प्रसारीत करून माझ्या कुटुंबीयांची बदनामी केली असून त्यामुळे माझे कुटुंबीय घाबरले आहे. मलाही यामुळे मोठाच मानसिक ताण सहन करावा लागला आहे. मलिक यांनी आपल्या मृत मातोश्रींविषयीही चुकीची माहिती सोशल मीडियातून प्रसारीत करून माझ्या भावनांना धक्का पोहचवला आहे अशी तक्रार एनसीबीचे प्रमुख अधिकारी समीर वानखेडे यांनी केली आहे. त्यांनी तसा आरोप करणारे एक प्रतिज्ञापत्रही कोर्टात सादर केले आहे.
माझ्या कुटुंबीयांविषयीची अनावश्यक माहिती सोशल मीडियातून प्रसारीत करणे हा माझ्या खासगी आयुष्यावरील अतिक्रमणाचा प्रकार आहे. माझे वडील, माझी मृत आई आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचेच हे एक षडयंत्र आहे असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी नवाब मलिक यांचे थेट नाव न घेता एका राजकीय नेत्याकडून असा उल्लेख या प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यांनी म्हटले आहे की मलिक यांच्या एका नातेवाईकाला आम्ही अटक केल्यामुळे सूड भावनेतूनच त्यांनी माझी ही बदनामी सुरू केली आहे.
माझ्या मातोश्री या मुस्लिम आहेत पण त्या सध्या हयात नाहीत. पण त्यांनी माझ्या मृत मातोश्रींना यात ओढण्याचे कारण काय असा प्रश्नही समीर वानखेडे यांनी उपस्थित केला आहे. माझ्या जातीच्या दाखल्यावरही आक्षेप घेतला गेला असून मी जातीचा खोटा दाखला सादर केला आहे असाही आरोप माझ्यावर केला गेला आहे असेही वानखेडे यांनी म्हटले आहे.