नवी दिल्ली – कांद्याचे किरकोळ बाजारातील दर सध्या फार उच्च पातळीवर नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कांद्यावर निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही, असे केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी स्पष्ट केले.
कांद्याचे दर काही प्रमाणात वाढल्यानंतर केंद्र सरकारने राखीव साठ्यातील बराच कांदा खुल्या बाजारासाठी उपलब्ध केल्यामुळे कांद्याचे दर सध्या नियंत्रणात आहेत. आगामी काळातही कांद्याचे दर वाढणार नाहीत, याबद्दल केंद्र सरकारला खात्री आहे.
कारण खरिपामध्ये कांद्याचे उत्पादन 43.88 लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी खरिपामध्ये 37.38 लाख टन इतक्या कांद्याचे उत्पादन झाले होते. त्यापेक्षा या वर्षी कांद्याचे उत्पादन जास्त झाले आहे.
सध्या देशांमध्ये सर्वसधारणपणे 41 रुपये प्रति किलो कांदा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या काळात कांद्याचा दर 55 रुपये प्रति किलो होता. या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. या विषयावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सरकारने कांद्याच्या उपलब्धतेकडे आणि किमतीकडे बारीक लक्ष ठेवले आहे.
कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणार का असे विचारले असता एकूण परिस्थिती पाहता कांद्याची निर्यात बंद करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. ज्या भागामध्ये कांद्याच्या किमती थोड्या वाढल्या आहेत त्या ठिकाणी राखीव साठयामधील 80 हजार टन इतका कांदा पाठविण्यात आला आहे.
सरकारकडे कांद्याचा राखीव साठा
सरकारने या कामासाठी दोन लाख टन कांद्याचा राखीव साठा केला होता. त्यातील एक लाख टन कांद्याचा साठा अजूनही शिल्लक आहे. त्याचबरोबर खरिपाचे पीक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात कांद्याची टंचाई जाणवणार नसल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या पंधरवड्यात काही भागांमध्ये पाऊस झाल्यामुळे कांद्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार कांद्याच्या उत्पादनामध्ये फारशी घट होणार नसल्याचे आढळून आले आहे.