मुंबई – भाजपचे खासदार वरूण गांधी यांच्या रूपाने सत्ताधारी गोटात एक मर्द निपजला. वरूण यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाचा निषेध केला. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी मांडला पाहिजे, अशी स्तुतिसुमने उधळत शिवसेनेने भाजपला डिवचले आहे.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाचा निषेध करत वरूण काही दिवसांपासून स्वपक्षाचीच गोची करणारी भूमिका मांडत आहेत. त्याचा आधार घेऊन शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून वरूण यांची तोंडभरून प्रशंसा करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर त्या प्रकरणावर साध्या संवेदना व्यक्त करू शकले नाहीत. भाजपच्या किती नेत्यांनी त्या घटनेचा धिक्कार केला? वरूण एकमेव अपवाद ठरले. त्यांनी हिंमत दाखवली. त्यामुळे वरूण आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळून शिक्षा केली गेली.
लखीमपूर खेरी प्रकरणावरून हिंदू विरूद्ध शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही वरूण यांनी केला आहे. तो गंभीर आहे, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.