सोलापूर – नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेला मुसळधार पाऊस व उजनी धरण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातून सोडण्यात येत असलेले 40 हजार क्युसेक विसर्गामुळे पंढरपूरमधील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनीचा विसर्ग सायंकाळी चाळीस हजार क्युसेक होता. तर वीरमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया दुपारी बंद करण्यात आली आहे. भीमा सोलापूर जिल्ह्यात दुथडी भरून वाहत असून नृसिंहपूर येथे 49 हजार क्युसेकचा विसर्ग मिळत होता तर पंढरीत नदी तीस हजार क्युसेकहून अधिकने वाहात असल्याने जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.
संभाव्य आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावनिहाय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच पूरपस्थितीत बोट व्यवस्था, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, तसेच स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थाची पथके तयार करण्यात आली आहेत.
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीवेळी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.