नवी दिल्ली – दरवर्षी दिल्लीत हिवाळ्यात जे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होते ते रोखण्यासाठी केजरीवाल सरकारने दहा कलमी कार्यक्रम निश्चित केला आहे. बायो-डिकॉम्पोझिटरचा वापर, स्मॉग टॉवर उभारून धुराचे नियंत्रण करणे, राब किंवा कचरा जाळण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणणे, वाहन प्रदूषण कमी करणे असे उपाय यात योजले जाणार आहेत.
दिल्ली शेजारच्या राज्यांनीही यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली शेजारील राज्यांनी वाहन प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे, सीएनजीवर आधारित वाहनांना चालना द्यावी, इथेनॉल सारख्या इंधनांचा वापर वाढवावा अशी सूचनाही केजरीवालांनी केली.
दिल्ली शेजारील राज्यांनी हवा प्रदूषण रोखण्यासाठी काहींही उपायोजना आजवर केली नाही, त्याचा मोठा दुष्परिणाम दिल्लीकरांना भोगावा लागतो असेही केजरीवालांनी म्हटले आहे. शेतातील राब जाळण्याच्या प्रकारामुळे दिल्लीत मोठे प्रदूषण होते आहे त्याकडे केंद्र सरकारनेही लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.