नवी दिल्ली – देश आर्थिक रिकव्हरीच्या मार्गावर आहे असे केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अजय सेठ यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोविडच्या लाटेचा मोठा फटका अर्थकारणाला बसला असतानाही मोदी सरकारने व्यापक प्रमाणावर आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवले.
त्यातून अर्थव्यवस्था उसळून पुन्हा रूळावर येईल आणि विकास दर वाढेल अशी अपेक्षा होती. त्याचे चांगले निष्कर्ष दिसून येत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. फिक्की संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की कोविडच्या काळात गेल्या अठरा महिन्यात खासगी गुंतवणुकीची डिमांड कमी झाली होती. त्या क्षेत्रात आता अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने गेल्या सात वर्षात सर्वसमावेशक आर्थिक धोरणावर आपले लक्ष केंद्रीत केले होते. त्याचेही चांगले परिणाम दिसून आले आहेत असे त्यांनी नमूद केले.
सरकारने या काळात शेतकऱ्यांना हमखास आर्थिक मदत मिळावी म्हणून पीएम किसान योजना राबवली, पीएमआवास योजना राबवून गरजूंना घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रीय जलजीवने मिशन राबवण्यात आले. सर्वांना वीज उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न हाती घेण्यात आले.
याचा एकत्रित चांगला परिणाम दिसून आला. ईनसॉल्व्हन्सी आणि बॅंकरप्सी कोड अस्तित्वात आल्याने 2 लाख 40 हजार कोटीच्या मालमत्तेवरचा ताण कमी झाला. एफडीआय आणि एफपीआय उदारीकरणामुळे विदेशी गुंतवणुकदारांचा भारतातील गुंतवणुकीवर विश्वास वाढला असेही त्यांनी नमूद केले.