पुणे – विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी ग्रामीण शहरी काहीही असो स्पर्धेत उतरण्याचा निर्णय हा विद्यार्थ्याने स्वत: घेतला पाहिजे. तरच स्पर्धात्मक वातावरणाची भीती न वाटता आत्मविश्वास निर्माण होतो. दिवसाच्या कोणत्या वेळेत अभ्यास करायचा हे महत्वाचे नाही. ध्येयावर लक्ष्य असेल तर तुमच्या दिनक्रमाची सर्वस्वी जबाबदारी ही विद्यार्थ्याची असली पाहिजे, असा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) माजी अध्यक्ष डी. पी. अगरवाल यांनी दिला.
प्रश्नोत्तरांच्या आधारे युनिक ऍकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव तसेच मुक्ता कुलकर्णी व मीनू जैन यांनी लिहिलेल्या “पॉलिटिकल सायन्स’ पुस्तकाचे प्रकाशन अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी द युनिक अकडमीचे नितीशा जगताप, वैभव बांगर, माधुरी गरूड, विद्याधर अजिंक्य या यशवंतांचा सन्मान करण्यात आला.
सध्याच्या विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांना शिकण्याचे खरेखुरे स्वातंत्र्य हवे असते. विषयाचे योग्य आकलन आणि वेळेचे व्यवस्थापन हे तयारीच्या टप्प्यात फार महत्वाचे आहे. निवड झालेल्या यशवंत अधिकाऱ्यांनी आगामी काळात देखील शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आवाहन अगरवाल यांनी यावेळी केले. यूपीएससीच्या प्रवासात कधी थांबावे याचा सारासार विचार देखील विद्यार्थ्यांनी करावा असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी आयआरएस ए. जे. खान, द युनिक अकॅडमीचे संचालक मल्हार पाटील व तुकाराम जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक जव्वाद काझी यांनी केले.