राजगुरूनगर (प्रतिनिधी) – राजगुरूनगर आगारातील एसटी बसेसला डीझेल उपलब्ध न झाल्याने एसटीची बससेवा ठप्प झाली. मुंबई, औरंगाबाद, सातारा, नाशिक आदीसह ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल झाले.
राजगुरूनगर एस टी बस आगारातून लांबपल्ल्याच्या गाड्या डीझेल अभावी आज सकाळपासून बंद ठेवण्यात आल्या. सुमारे 150 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. राजगुरुनगर आगारातून ग्रामीण डोंगराळ भागासह पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर परिसरात जाणारी एसटीची वाहतूकसेवा बंद झाल्याने बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. अचानक एसटी सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नोकरदार आणि एसटी प्रवास करणाऱ्यांवर खासगी वाहनाने प्रवास करावा लागल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
राजगुरूनगर एसटी आगारातून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह इतर ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या जात येत असतात. त्यातून मोठी उलाढाल होते. लॉकडाऊननंतर प्रवाशांच्या मागणीनुसार अनेक लांब पल्ल्याचा गाड्या या आगारातून सोडण्यात येत होत्या. त्या माध्यमातून जवळपास 250 फेऱ्या होत होत्या; मात्र त्यासाठी लागणारे डीझेल पुरवठा न झाल्याने आज लांब पल्ल्याच्या सुमारे 150 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर खेड, आंबेगाव या दोन्ही तालुक्याला सेवा देणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली. तरीही उपलब्ध असलेल्या डीझेलवर ग्रामीण भागात एसटीच्या काही फेऱ्या झाल्याने सकाळपासून दुपारपर्यंत अडलेल्या नागरिकांना सोडण्यात आले.
“आज डीझेल उपलब्ध न झाल्याने एसटीच्या सुमारे 150 फेऱ्या लांबपल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. ग्रामीण भागात काही ठिकाणी सेवा देण्यात आली. पुणे विभागीय कार्यालयातून राजगुरूनगर आगारातील बसेससाठी डीझेल पुरवठा होतो; मात्र तो न आल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली. आज उद्यापासून बस सेवा सुरळीत होईल. वरिष्ठांशी संपर्क झाला असून डीझेल उपलब्ध करून दिले जाणार आहे.
-शिवकन्या थोरात, आगार व्यवस्थापक राजगुरूनगर
एसटीच्या कारभारावर संताप
राजगुरूनगर एसटी बस आगारातील डीझेल संपल्याने एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गर्दी आगारात झाली. तासनतास बसून राहावे लागले ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी खासगी वाहनाचा वापर करून प्रवास केला; मात्र केवळ एसटी बसवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांचे मात्र मोठे हाल झाले. त्यांनी एसटीच्या कारभारावर मोठा संताप व्यक्त केला.