जागतिक क्रिकेटमध्ये जवळपास 21 वर्षांपूर्वी भूकंप झाला होता. मॅचफिक्सिंग घडले होते आणि तेव्हापासून कोणताही संघ सामना हरला की तो सामना फिक्सच होता, असे बोलले जाऊ लागले. आता त्यानंतर आयसीसीने सर्व सदस्य देशांच्या सहकार्याने यावर कठोर नियमावली तयार करीत ही कीड हद्दपार करण्याची मोहीम हाती घेतली असली, तरीही काही स्पर्धांमध्ये हे घडत असल्याचा संशय आजही येतो. अशीच एक घटना यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील एका लढतीत घडली आहे.
आता आयसीसी, आयपीएल समिती व बीसीसीआय या घटनेचा कसून तपास करीत असली तरीही या घटनांना नेमक्या कोणत्या उपायांनी रोखायचे, हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्ज या संघातील सामन्यात एक घटना घडली व त्यामुळे क्रिकेटवर पुन्हा एकदा फिक्सिंगचे सावट येणार का, अशी भीती वाटू लागली. या सामन्यात अखेरच्या षटकात कार्तिक त्यागीने अफलातून गोलंदाजी करत राजस्थानला पंजाबविरुद्ध अविश्वसनीय विजय मिळवून दिला. मात्र, या सामन्यापूर्वी पंजाबचा क्रिकेटपटू दीपक हुडा याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट आता वादग्रस्त ठरत आहे.
हुडाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर एक फोटो पोस्ट केला होता. त्या पोस्टमध्ये त्याने पंजाबची जर्सी आणि हेल्मेट घातले होते. त्या पोस्टला, “हिअर वी गो अगेन’, अशी कॅप्शनही त्याने दिली होती. म्हणजेच सामना सुरू होण्यापूर्वी अंतिम 11 खेळाडूंच्या संघात माझा समावेश आहे, असा त्याने फिक्सर्स किंवा बुकींना संदेश दिला असेल का, हा प्रश्न निर्माण झाला व सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. हुडाने केलेली ही पोस्ट सामना सुरू होण्यापूर्वीची होती. त्यामुळे या पोस्टमधून हुडा याचा संघात समावेश आहे, असा संदेश तो फिक्सिंग माफियाला देत आहे, असेही मत व्यक्त होत आहे.
हुडाच्या या इन्स्टाग्राम पोस्टची दखल आता बीसीसीआय, आयसीसी व आयपीएल समिती यांनी घेतली असून सायबर संगणक तज्ज्ञांकडून त्याचा तपासही केला जात आहे. जर यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत चौकशी समितीचे अध्यक्ष शब्बीर हुसेन शेखादाम खंडवावाला यांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. ही समिती आयपीएल
स्पर्धेवर सातत्याने लक्ष ठेवून असते व काही चुकीचे घडत असल्याचे निदर्शनास आले तर त्याचा सखोल तपास केला जातो. हुडाने जी इन्स्टाग्राम पोस्ट केली त्यावर आता ही समिती चौकशी करत असून त्याचा सविस्तर अहवाल बीसीसीआयला सादर केला जाईल व त्यानंतरच हुडावर काय कारवाई होणार, ते समोर येईल.
हे झाले यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील घडलेल्या घटनेचे कवित्व. मात्र, मुळातच ही कीड खेळापासून दूर करण्यात आजही अपयश येत आहे, ही वस्तुस्थिती आहे. 1999-2000 साली जागतिक क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंगचा भूकंप झाला होता व मोठे मासे समोर आले होते. मात्र, त्याचा सूत्रधार कधीही समोर आला नाही. अंडरवर्ल्ड तसेच बुकींकडून हे घडल्याचे आजही सांगितले जात असले तरीही ते उघड झाले नाही. सफेदपोश चेहरे अद्यापही राजरोसपणे फिरत आहेत, हीच शोकांतिका आहे.
दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिए याने सद्सद्विवेकबुद्धीला जागून केलेल्या पापाची कबुली दिली. मात्र, त्याचे भारतासह जगभरातील भाऊबंध क्लिन चिट मिळवत उजळ माथ्याने फिरत आहेत, याचे वाईट वाटते. बीसीसीआयने त्यावेळी या प्रकरणाचा तपास करताना के. माधवन समितीची स्थापना केली होती. त्यावेळी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची तसेच त्यांना कोण केव्हा भेटले किंवा ते कुठे कुठे गेले होते व कोणाला भेटले याचा कसून तपास केला गेला व त्याच अनुषंगाने चौकशीही केली गेली.
त्यानंतर या समितीने आपला अहवाल बीसीसीआयला सादर केला. त्यात भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार महंमद अझरुद्दीन, निखिल चोप्रा, अजय शर्मा, अजय जडेजा व नयन मोंगिया यांची नावे समोर आली. अझहर व अजय शर्मा यांच्यावर तहहयात बंदी लावली गेली. अजय जडेजा व मोंगियावर पाच वर्षांची बंदी लावली गेली. चोप्राला संशयाचा फायदा देत या आरोपातून वगळण्यात आले. ही झाली त्यावेळची कारवाई पण त्यातून हाती काय लागले, तर काहीही नाही.
अझहर व शर्मा यांच्यावरची बंदी हटवली गेली. जडेजाने बंदी कालावधी संपल्यावर रणजी स्पर्धेत पुनरागमन केले. आता तर काय तो क्रिकेट समीक्षक म्हणून कार्यरतही आहे. मोंगियाही राजरोसपणे फिरतो आहे. म्हणजेच या संपूर्ण प्रकरणात एकट्या क्रोनिएने जीव गमावला. आपल्या पापाची कबुली दिल्यानंतर काही काळातच त्याचा एका विमान अपघातात मृत्यू झाला. हा मृत्यू अपघाती आहे का घातपात हे अद्यापही कोडेच आहे. त्यावेळी क्रोनिएसह दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्ज व निकी बोए यांचीही नावे समोर आली होती.
बोए तसा प्रसिद्धीच्या झोतापासून दूर आहे तर गिब्ज आजही अटकेच्या भीतीने भारतात येत नाही. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले तरीही चौकशी व तपास यातून काहीही हाती लागले नाही. त्यावेळी बुकींना खेळपट्टी, वातावरण तसेच अंतिम 11 खेळाडूंची यादी देण्याचे गैरवर्तन केल्याची कबुली ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉ व शेन वॉर्न यांनीही दिली होती. त्यांच्यावरही नाममात्र कारवाई केल्याचा फार्स केला गेला. पाकिस्तानमध्ये तर सलिम मलिक, शाहिद आफ्रिदी, सलमान बट, महंमद आमीर, महंमद आसीफ, शरजील खान, खलिद लतिफ, दानिश कनेरिया, शहजीब हसन, नासीर जमशेद यांच्यावर तर आरोप सिद्ध झाल्याने कठोर कारवाई झाली.
मात्र, संदिग्ध भूमिका वाटल्याने वासिम अक्रम, वकार युनुस व इंझमाम उल हक यांना दंड करून संशयाचा फायदा देत सोडण्यात आले. उमर अकमल हा खरा ब्रेन होता. मात्र, त्याच्यावरही कारवाईचा केवळ फार्सच केला गेला. असो, इतिहासातून बोध घ्या असे सांगितले जाते मात्र, आयसीसीपासून सर्वच देशांच्या क्रिकेट मंडळांना या घटनांवर कायमचा इलाज करण्यात आजही अपयश येत आहे.
सामन्यापूर्वी आपला किंवा अन्य कोणा खेळाडूचा संघात समावेश आहे हे सांगणेही गुन्हाच ठरतो. यामुळे हुडावर कारवाई करून नेमका संदेश आयपीएल समिती देणार का, हा खरा प्रश्न आहे.
अमित डोंगरे