लोकशाही राजकारणामध्ये नेत्यांची भाषणबाजी आणि टाळ्या घेणारे डायलॉग हा अविभाज्य भाग असला, तरी काही वेळा हा भाषणाचा संवाद अनावश्यक वाद निर्माण करून विसंवादाचे वातावरण निर्माण करतो. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेली विधाने हा संवादाचा भाग असला तरी त्यामुळे विनाकारण एक विसंवादाचे वातावरण निर्माण झाले आहे असेच दिसते.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रायगड जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे काही आमचे नेते नाहीत आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ही केवळ तडजोड आहे, अशा प्रकारचे विधान केले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्याचे आक्षेपार्ह विधानही या कार्यक्रमात अनंत गीते यांनी केले.
गीते यांच्या या विधानावरून निर्माण होणारा संभाव्य वाद लक्षात घेता शिवसेनेचे खासदार आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासाठी पुढाकार घेणारे संजय राऊत यांनी लगेच सारवासारव करून शरद पवार हे देशाचे नेते आहेत, अशा प्रकारचे विधान करून अनंत गीते यांनी निर्माण केलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही अनंत गीते यांच्या या विधानाची दखल घेऊन महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत असताना अशा प्रकारची विधाने करून विनाकारण विसंवाद निर्माण करू नये, अशा प्रकारच्या कानपिचक्या अनंत गीते यांना दिल्या आहेत.
मुळात अनंत गीते यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने अशाप्रकारचे विधान का केले, याचाही शोध यानिमित्ताने घ्यावा लागणार आहे. गेल्या सुमारे दोन वर्षांच्या कालावधीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेची काही नेत्यांची फळी मागे पडली आहे. शिवसेनेची पक्षसंघटना किंवा सरकारमधील सहभाग यात जे शिवसेनेचे नेते बाजूला पडले आहेत ते अधूनमधून अशा प्रकारची विधाने करून महाविकास आघाडीच्या सरकारला अडचणीत आणण्याचा कार्यक्रम करत आहेत, असेच दिसते.
औरंगाबादमधील शिवसेनेचा चेहरा असणारे चंद्रकांत खैरे हेसुद्धा अधूनमधून अशा प्रकारची विधाने करून महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. शिवसेनेसारख्या पक्षामध्ये पक्ष संघटनेपासून बाजूला पडणारे नेत्यांची विधाने फारशी मनावर घेतली जात नसली, तरी जेव्हा राज्यात महाविकास आघाडी हे तीन पायांचे सरकार चालत असते तेव्हा अशा प्रकारची विधाने होऊ नयेत याची दक्षता घ्यावीच लागणार आहे.
अर्थात, केवळ महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असणाऱ्या एखाद्या पक्षाच्या नेत्यानेच सरकार पक्षातील एखाद्या नेत्यावर टीका करणे यापूरता संवादाचा हा विसंवाद मर्यादित राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये इतर पक्षांतील नेतेही सरकारबाबत जरी बोलत नसले, तरी वादग्रस्त विधाने करून वाद निर्माण करीत आहेत. विदर्भातील कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री सुनील केदार यांनी पक्षसंघटनेच्या एका कार्यक्रमात बोलताना कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गाडीतून उतरून लाथा घातल्या पाहिजेत, अशा प्रकारचे एक वादग्रस्त विधान केले आहे.
अर्थात, हे विधान त्यांच्या पक्षापुरते जरी मर्यादित असले, तरी मंत्री पदावरील एखाद्या नेत्याने अशा प्रकारचे विधान करणे शोभत नसल्याने या विधानावरूनही वाद सुरू झाला आहे. कॉंग्रेस पक्षातील काही नेते विशेषत: नाना पटोले सतत स्वबळाची भाषा करून काही प्रमाणात वाद निर्माण करत असतात. अर्थात, तो पक्षाच्या धोरणाचा भाग असतो. एकीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एकेका मंत्र्यांचे कथित भ्रष्टाचार बाहेर काढत असताना महाविकास आघाडी सरकारने एकसंधपणे लोकांसमोर येणे आवश्यक असताना अशाप्रकारे विनाकारण विसंवाद निर्माण होणे सरकारला परवडणारे नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.
आघाडी सरकार अस्तित्वात यावे म्हणून मनापासून प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विद्यमान मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सरकारमधील कॉंग्रेसचा चेहरा असणारे बाळासाहेब थोरात यांनी आता पुढाकार घेऊन महाविकास आघाडी सरकारमधील समन्वय वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. भाजपसारखे विरोधी पक्ष जर सरकारवर टीका करून सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत असतील, तर ते त्यांचे कर्तव्य आहे. पण आघाडीमधील घटकपक्षांचे नाराज नेते जर विनाकारण काही विधाने करून सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत असतील तर त्याची गंभीर दखल सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे, विशेषतः शिवसेनेला हा विषय अधिक गांभीर्याने घ्यावा लागणार आहे.
कारण शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली आहे. भाजपबरोबर सुमारे पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ संसार करणाऱ्या आणि या संसाराचा भाग असणाऱ्या अनेक जुन्या नेत्यांना आजही भाजपचीच मैत्री हवी आहे. भाजपसारख्या जुन्या मित्राने शिवसेनेचा योग्य सन्मान न राखल्याने शिवसेनेला कॉंग्रेस व राष्ट्रवादीबरोबर नव्याने घरोबा करावा लागला ही गोष्ट आता सेनेच्या प्रत्येक नेत्याच्या मनामनात रुजविण्यासाठी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना परिश्रम घ्यावे लागणार आहे. अनंत गीते यांनी केलेले विधान सरसकट चुकीचे आणि वाद निर्माण करणारे आहे, यात शंका नाही. 50 वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारण करणारे शरद पवार यांच्या मुत्सद्देगिरीमुळेच भाजपला शह देऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, हे विसरून चालणार नाही.
केंद्रीय पातळीवर कृषी आणि संरक्षण मंत्री ही महत्त्वाची खाती सांभाळणारे शरद पवार यांना केंद्रीय राजकारणामध्येही मोठा मान आहे याची जाणीव एकेकाळी केंद्रीय मंत्री म्हणून काम करणारे अनंत गिते यांना नसावी, याचे आश्चर्य वाटते. अशा प्रकारच्या विधानामुळे जो विसंवाद निर्माण होतो तो टाळता येण्यासारखा आहे. अशा प्रकारचे मतप्रदर्शन करून महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्षातील काही नेते विनाकारणच विरोधी पक्षाच्या हातात कोलीत देत आहेत.