राजगुरुनगर – आजी- माजी खासदार रेल्वे व तालुक्यातील प्रकल्पांचे केवळ श्रेय घेण्यासाठी आहेत का? शेतकऱ्यांचे प्रश्न का सोडवत नाहीत? असा सवाल करीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि स्वपक्षीय खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आमदार दिलीप मोहिते यांनी टार्गेट केले. रिंग रोड व रेल्वे प्रकल्प होऊ नये, यासाठी मी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम आहे. शेतकऱ्यांसोबत हा लढा लढू. मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत याबाबत शेतकऱ्यांची बाजू मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन मोहिते यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.
खेड तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या बारा गावांतून रेल्वे, रिंग रोडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. याबाबत बाधित गावातील शेतकऱ्यांनी आंदोलने करूनही शेतकऱ्यांवर शासनाकडून न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांची भूमिका शासनाकडे मांडण्यासाठी उद्या (दि. 13) मंत्रालयात होणाऱ्या रिंगरोडच्या बैठकीत आमदार दिलीप मोहिते यांनी आवाज उठवावा व हे प्रकल्प या गावातून हद्दपार करावेत, अशी मागणी प्रत्यक्ष भेटून व मागण्याचे लेखी निवेदन देत आमदार मोहिते पाटील यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी, माजी सभापती कल्पना गवारी, चंदन मुऱ्हे, सचिन येळवंडे, संतोष येळवंडे, किरण मुंगसे, संदेश गायकवाड, सुनील वर्पे, आशा गवारी, करुणा गवारी, सागर कुऱ्हाडे, रवी कुऱ्हाडे, गणेश येळवंडे, हरिभाऊ खांदवे, चंद्रभागा वर्पे, नयना वर्पे, संतोष लोखंडे, निखिल थोरवे यांच्यासह प्रकल्प बाधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले, पुणे रिंगरोड, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, पीएमआरडीए आराखडा प्रकल्पांना आपला सुरुवातीपासून विरोध आहे. तालुक्यातील शेतकरी अडचणीत येऊन त्या प्रकल्पांचा कवडीचा लाभ होणार नसेल, तर अशा योजना कोणी कितीही लादल्या तरी त्या हाणून पाडल्या जातील.
पुणे रिंगरोड, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, पीएमआरडीए प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी अडचणीत येणार आहेत; मात्र सत्तेतील नेत्यांना कोणीही आमदार विरोध करणार नाही. जिल्ह्यातील 18 आमदारांमध्ये आक्रमक आमदार म्हणून मोहिते पाटील यांच्या नावाला वलय आहे. तुम्ही पवारांना विरोध करा. आमच्या वरील संकट कायमस्वरूपी दूर होईल. आम्ही कायम तुमच्या पाठीशी उभे राहू.
-पाटीलबुवा गवारी, रिंगरोड कृती समितीचे अध्यक्ष