पुणे – अकरावी प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाने मोबाइल ऍप निर्मिती केली आहे. मात्र, अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वीच ऍप उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यावरून पालकांची ओरड होत आहे. शिक्षण विभागाला “उशिरा सुचलेले शहाणपण’ अशीच प्रतिक्रिया पालकांतून उमटत आहे.
अकरावीची प्रवेशप्रक्रिया गेल्या काही वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. तेही विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक या शहरात पूर्णत: ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया होत आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मोबाइल ऍपची सुविधा होणे आवश्यक होते. आता अकरावीसाठी पाच शहरांतून जवळपास 2 लाख 89 हजार 420 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. एवढेच नव्हे, तर दि. 27 ऑगस्ट रोजी अकरावीची पहिली गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली.
त्यात पाचही शहरातील एकूण 1 लाख 88 हजार 369 विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आला आहे. तथापि, अकरावी प्रवेशाचा निम्मी प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना उशिराने मोबाइल ऍपची निर्मिती करण्यावरून पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत मात्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले.
तब्बल 1 लाख 88 हजार 369 प्रवेश झाल्यानंतर सुचलेल्या शहाणपणावर पालक संतप्त
इन्स्टॉल करा “पीओईएएम’ ऍप
विद्यार्थी आता “पीओईएएम’ ऍपच्या माध्यमातून अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण शकतील. विद्यार्थ्यांना गुगल “प्ले स्टोअर’ आणि “आयओएस’वर ही ऍप उपलब्ध होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. करोनाचे संकट आणि महाविद्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी या ऍपचा उपयोग होणार आहे.
इतक्या उशिरा सुविधेचा काय उपयोग?
अकरावीची पहिली यादी जाहीर होताच मोबाइल ऍप्लिकेशन पालकांच्या हाती आले आहे. इतक्या उशिरा याचा काय उपयोग? शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची हितासाठी काही करू इच्छित असेल, तर हे ऍप लॉंच करण्यास इतकी दिरंगाई का? इतका वेळकाढूपणा करण्यात काहीच अर्थ नाही, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी प्रवेशासंदर्भात असलेल्या मोबाइल ऍपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.