चंडीगड – 19 वर्षांची तरूण 67 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकासोबत पळून गेली आहे. त्या दोघांच्या वयात तब्बल 50 वर्षांचे अंतर असून हरियानातील पलवल जिल्ह्यातील हे प्रेमीयुगुल पळून गेल्याच्या घटनेची पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयानेही धक्कादायक अशी नोंद करून दखल घेतली आहे.
आणि या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्या मुलीने ज्येष्ठ नागरिकासोबत लग्न केले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या आपल्या शांततापूर्ण वैवाहिक जीवनात नातेवाईकांनी आडकाठी आणू नये, जीवाला आणि स्वातंत्र्याला संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
न्या. जसगुरुप्रीत सिंग पुरी यांनी याप्रकरणावर आदेश दिले आहेत. ते म्हणतात, 19 वर्षांची मुलगी 67 वर्षाच्या व्यक्तीबरोबर लग्न करते हे धक्कादायक आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या अर्जावरून आणि अर्जदारांच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरून हे स्पष्ट होत नाही की, त्या ज्येष्ठ व्यक्तीचा घटस्फोट झाला आहे किंवा त्याची पहिली पत्नी हयात आहे किंवा नाही. त्याचे हे दुसरे लग्न आहे किंवा त्या मुलीने कुठल्या परिस्थितीत हे लग्न केले आहे याची कल्पना येत नाही.
तपास पथक पुरूषाची पार्श्वभूमी शोधणार.
प्रथमदर्शनी हे सगळे संशयास्पद वाटत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्या मुलीचे जबरद्स्तीने लग्न लावण्यात आल्याची शक्यता असू शकते. या प्रकरणाची वैशिष्ट्यपूर्ण स्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने पलवलच्या जिल्हा पोलिस अधिक्षकांना तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हे पथक सध्याचे लग्न आणि त्या व्यक्तीचे आधीचे लग्न, त्याची पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टींचा तपास करणार आहे.