– डॉ. कैलास दौंड
साहित्य संशोधनाच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना तांत्रिक बाबींचे आणि आशयाच्या विश्लेषणासंबंधीचे मार्गदर्शन हवे असते. पीएच.डी किंवा अन्य तत्सम पदवी मिळवू इच्छिणाऱ्यांना तर विषय निवडीबाबतही मार्गदर्शनाची गरज पडते. मात्र हे मार्गदर्शन त्यांनी निवडलेल्या मार्गदर्शकांकडून मिळतेच असे नाही.
अनेक संशोधकांची तर विषय निवडीबाबतही स्वत:ची काही भूमिका नसते. ही अडचण प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी “साहित्य संशोधन : वाटा आणि वळणे’ हा मौलिक ग्रंथ लिहून दूर केली आहे. प्रबंधलेखनाच्या अनुषंगाने मराठीत या आधी काही पुस्तके आलेली असली तरी विस्तृत आणि व्यापक पार्श्वभूमी असलेले हे एकमेव पुस्तक आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
प्रस्तुत लेखकाने या पुस्तकाची मांडणी सुटसुटीतपणे तर केलेली आहेच; त्याचबरोबर माहितीपर आणि तांत्रिक बाबींचा समावेश असूनही लेखकाने कुठेही बोजडपणा येऊ दिलेला नाही.
वैचारिक साहित्यासोबतच ललित वाङ्मयातील कविता, चरित्र-आत्मचरित्र, कादंबरी, कथा, नाटक या साहित्यप्रकारातील साहित्यकृतींचे संशोधन वा समीक्षा या संदर्भात प्रकरणवार केलेले
नेमके भाष्य संशोधकांना नेमकी दृष्टी देणारे आणि संशोधनविषयक जाणिवा समृद्ध करणारे आहे. प्रत्येक साहित्यप्रकाराचे मूल्यमापन करताना, समीक्षा किंवा संशोधन करताना कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो याची डॉ. शेलार यांनी केलेली नेमकी मांडणी आकलन सुलभ झाली आहे. साहजिकच या पुस्तकाची उपयुक्तता केवळ संशोधक, समीक्षक यांच्यापुरती मर्यादित न राहता ती ललित लेखकांनाही साहाय्यभूत ठरणार आहे.
कारण कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या प्रकारातील साहित्यकृतीच्या समीक्षेत आणि संशोधनात कोणकोणत्या बाबींचा कसकसा विचार केला जातो, याची वस्तुनिष्ठ चर्चा सदर ग्रंथात असल्यामुळे जाणिवा अधिक समृद्ध होऊन नवसाहित्यिकाला लेखन करताना त्याचा उपयोग होणार आहे.
लेखनात राहणाऱ्या त्रुटी, भाबडेपणा, टाळायला या पुस्तकाच्या वाचनामुळे मदत होईल. व्यक्तिरेखा, भाषा, घटना-प्रसंगांचे चित्रण, जीवनमूल्यविवेक आणि लेखनाची गुणवत्ता सुधारायलाही हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल, यात शंका नाही. संशोधन पदवीच्या मार्गदर्शकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक आहे.
“व्यक्ती आणि वाङ्मय’ या विषयात पीएच.डीचे सर्वाधिक प्रबंधलेखन झाल्याचे वास्तव निरीक्षण नोंदवून या विषयात संशोधन करणाऱ्या बहुतांश लोकांची फसगत का होते ते सांगून अभ्यासार्थ लेखकाची निवड करण्याविषयी त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले आहे. मध्ययुगीन मराठी
वाङ्मयाचे संशोधन, लोकसाहित्याचे संशोधन स्वरूप, आंतरविद्याक्षेत्रीय सहसंबंध आणि संशोधन या बाबतीतल्या संशोधनासाठी उपयुक्त आणि दिशादर्शक ठरणारे मूलभूत स्वरूपाचे आणि आकलनसुलभ विवेचन त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणांतून स्वतंत्रपणे केलेले आहे.
मराठी भाषेतील साहित्यसंशोधनाच्या वाटा रुंदावणारा हा ग्रंथ लिहिण्यामागे लेखकाचा प्रदीर्घ अनुभव व तळमळ स्पष्ट दिसते. प्राध्यापक, लेखक, संशोधक यांच्यासह वाचकानींही अभ्यासावे असे हे बहुआयामी आणि बहुउपयोगी पुस्तक आहे. त्यामुळे त्याची फलश्रुती संशोधनाची स्थिती सुधारण्यासाठी निश्चितच मदत करणारी असेल यात शंका नाही. अक्षरवाङ्मय प्रकाशन पृष्ठे- 208, मूल्य- 180 रु.