नवी दिल्ली – केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काही उद्योग राष्ट्रहिताऐवजी स्वतःच्या उद्योगाच्या फायद्याला प्राधान्यक्रम देतात असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर समाजमाध्यमावर टीका वाढू लागली आहे. त्याचबरोबर काही राजकीय पक्षांनी गोयल यांचे हे वक्तव्य अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
परवा भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना गोयल यांनी काही बडे उद्योग राष्ट्रीहिताकडे दुर्लक्ष करतात असे वक्तव्य केले होते. टाटा समूहाने नियोजित ई-कॉमर्स धोरणाला विरोध केल्याची बाब आपल्याला खटकली आहे असेही गोयल यांनी सांगितले होते. तसेच आपले हे मत आपण टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कानावर स्पष्टपणे घातले होते, असेही गोयल म्हणाले होते.
उद्योगांनी केवळ त्यांच्या नफ्याकडे लक्ष देऊ नये. त्याचबरोबर स्थानिक नियमाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती थांबवावी या गोयल यांच्या वक्तव्यावर समाजमाध्यमात टीकेचा भडिमार सुरू झाल्यानंतर सरकारने याची दखल घेतली आणि महासंघाला गोयल यांचे वक्तव्य असणारे व्हिडीओ डिलीट करायला सांगितले. या विषयावर उलट सुलट चर्चा सुरु झाल्यानंतर गोयल किंवा महासंघाच्या कार्यालयाने यावर प्रतिक्रिया नाकारली.
कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी गोयल यांचे वक्तव्य मानहानिकारक असल्याचे ट्विट केले आहे. टाटा समूहाने ई-कॉमर्स क्षेत्रात उतरण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. मात्र सरकारच्या नियोजित नियमावलीमुळे यामध्ये अडचणी येऊ शकतात असे टाटा समूहाने वाणिज्य मंत्रालयाला सांगितल्याचे समजते. टाटा समूहाने थेट या विषयावर प्रतिक्रिया देण्यास आतापर्यंत तरी नकार दिला आहे. गेल्या आठवड्यात गोयल यांनी परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांच्या कारभारावर टीका केली होती. या कंपन्यांविरोधात चालू असलेली स्पर्धा आयोगाच्या चौकशीचे स्वागत केले होते.
माजी माहिती तंत्रज्ञान मंत्री मिलिंद देवरा यांनीही गोयल यांच्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले की जगभर उद्योगांना सरकार मदत करीत असताना भारतातील सरकार मात्र उद्योगांना तोट्याकडे ढकलत आहे. इतर क्षेत्रातून गोयल यांच्या वक्तव्यावर टीका होत असली तरी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापाऱ्यांच्या संघटनेने मात्र गोलयल यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे.
टाटा समूहाचा नियोजित धोरणाला असलेला विरोध दुर्दैवी असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. याच कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र उद्योग जगताने जोखीम घेऊन आगामी काळात वाटचाल करावी सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे म्हटले होते.