कोल्हापूर- जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे 1 हजार 50 कोटीहून अधिक रकमेचे नुकसान झाले असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे विविध मार्गाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून आगामी काही दिवसात ही प्रक्रिया पुर्ण होईल अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली.
सध्या जिल्ह्यात पुरबाधित क्षेत्रात पंचमाने सुरु आहेत. जिल्ह्यातील पुरबाधितांना सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात 71 हजार 289 इतकी पुरबाधित कुटुंबसंख्या असून त्यापैकी 61 हजार 864 इतक्या जणांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. अतिवृष्टीमुळे 5 हजार 789 घरांची अंशता तर 1 हजार 107 घरांची पुर्ण पडझड झाली आहे.
त्यापैकी अनुक्रमे 5 हजार 103 व 809 इतके पंचमाने पुर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 2 हजार 466 गोठा पडझडी पैकी केवळ 646 पंचनामे शिल्लक राहिले आहेत तर 12 हजार 157 दुकानधारकांपैकी सुमारे 9 हजार 675 जणांचे पंचनामे पुर्ण आहेत.
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसला असून पुरामुळे 58 हजार 997 हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले त्यापैकी आज अखेर 24 हजार 670 हेक्टर इतक्या क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 7 व्यक्ती मृत झाल्या होत्या. शासकीय निकषानुसार 6 मृत व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पात्र असून या मृत्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
तर 1 मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत मदत देण्यासंदर्भातील प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
या आपत्तीमध्ये 161 जनावरे मयत झाली असून, 13 कुटुंबातील सुमारे 15 हजार 178 इतक्या पोल्ट्री पक्षांचा पंचनामा पुर्ण झाला आहे.
हस्तकला, हातमाग, क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 1 हजार 169 कारागीरांपैकी 941 जणांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत.
उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पुर्ण करावेत अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.