मुंबई – राज्यात करोना प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी ठाकरे सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी आणि शिक्षणात १ टक्के आरक्षण दिलं जाणार असल्याची घोषणा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री योशमती ठाकूर यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज कॅबिनेट बैठक पार पडली. बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
करोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यानं अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी राज्य सरकारनं घेतली होती. त्यानंतर आता अनाथ बालकांच्या भविष्याच्या दृष्टीनं त्यांना नोकरी आणि शिक्षणात १ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान राज्यात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राज्यात राबवली जाणार आहे. तसंच राज्यात महिलांसाठी ५० हॉस्टेल्स उभारली जाणार असल्याचीही माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.