काबुल – अफगाणिस्तानातील युद्धाला पाकीस्तानच जबाबदार आहे, अशी टीका पश्तुन नेत्याने केली आहे. इम्रान खान यांच्या सरकारकडून अफगाणिस्तानमधील युद्धाला पाठिंबाच दिला जात आहे. प्रादेशिक स्थैर्यासाठी अफगाणिस्तानातील शांतता आवश्यक असल्याचे पश्तुन नेते महमूद खान अचकझाई यांनी म्हटले आहे. अचकझाई हे पाकिस्तानातील आवामी नॅशनल पार्टीचे नेते आहेत.
जगाने अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याचा आदर राखला पाहिजे. जर पाकिस्तानने अफगाणिस्तानसंदर्भात त्वरित काही कृती केली नाही तर अफगाणमधील युद्ध लवकरच इस्लामाबादपर्यंत येऊन ठेपेल, असेही अचकझाई यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानमध्ये एकछत्री अंमलच असायला पाहिजे. त्यासाठी जगाने अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याचा पूर्ण आदर केला पाहिजे.
अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेतले जाण्याबरोबर तालिबानने तेथील सामान्य जनतेवर, सुरक्षा दलांवर आणि अफगाणी सैन्यावर हल्ले करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही आठवड्यात तालिबानने ईशान्येकडील तक्षर सारखे काही महत्वाचे जिल्हे ताब्यात घेतले आहेत. तालिबानला पाकिस्तानकडून सहाय्य मिळत असल्याचा आरोप अफगाण सरकारने केला आहे.
स्पीन बोलडाक भाग जर अफगाण फौजांनी परत मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकीही पाकिस्तानने दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये अनेक देशांमधील दहशतवादी सक्रिय असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचे आणि तालिबानचे निकटचे संबंध आहेत आणि या संघटनेचे सुमारे 6 हजार दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये आहेत, असेही संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.