सातारा – ऑनलाइन खरेदी स्वस्तात होते, असा समज करून घेऊन, विविध ई-कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळांवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना करोनाच्या महामारीत आर्थिक फटका बसू लागला आहे. नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बोगस कंपन्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत आहेत.
समाजमाध्यमांद्वारे लिंक पाठवून, स्वस्तात खरदीचे आमिष ग्राहकांना दाखवले जाते. त्याला बळी पडून सर्वसामान्य लोक खरेदी करतात; परंतु वस्तू हातात आल्यावर निराशा होते. विशेषत: कपड्यांची ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, आपण फसवले गेल्याचे लक्षात येते. ऑनलाइन मागवलेल्या नवीन कपड्यांच्या ऐवजी जुने व वापरण्यायोग्य नसलेले कपडे हातात मिळाल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. हा ऑनलाइन खरदीचा भूलभुलैया ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबत माहिती अशी, नामवंत कंपन्याच्या ब्रॅंडच्या नावाखाली काही बोगस कंपन्या त्यांच्या लिंक समाजमाध्यमांद्वारे लोकांना पाठवत आहेत. त्याद्वारे बाजारपेठेपेक्षा कमी दरात कपडे देण्याचे आमिष दाखवले जात असल्याने, त्या लिंकचा वापर करून खरेदीकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यक्षात काही नामवंत कंपन्या सोडल्या, तर त्यांच्या नावाखाली विक्री करणारे रॅकेट ग्राहकांची फसवणूक करत आहे.
सातारा शहरातील अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना आहेत. एखाद्याने मागवलेल्या कपड्यांच्या ऐवजी फाटके कपडे घरपोच दिले जात आहेत. अगदी शंभर रुपयांमध्ये टी-शर्ट मिळतो म्हणून ऑनलाइन पैसे पाठवणाऱ्यांना भलतेच कपडे मिळत आहेत.
“कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडला असला, तरी डिलिव्हरी बॉय रोख रक्कम मिळाल्यावरच ते पार्सल ग्राहकाच्या हातात देतो. पैसे देण्यापूर्वी वस्तूची खात्री ग्राहकाला करू दिली जात नाही. डिलिव्हरी बॉय पैसे घेऊन गेल्यानंतरच ग्राहकाला पार्सल फोडून त्यातील वस्तू पाहता येते. त्यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित ई-कॉमर्स कंपन्यांच्या “कस्टमर केअर’ला फोन केल्यास उत्तर दिले जात नाही.
काही वेळा तो क्रमांक बंद असल्याची रेकॉर्ड वाजते. सर्वसामान्यांचा कल ऑनलाइन खरेदीकडे असला, तरी त्यातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. नागरिकांनी अधिकृत कंपन्यांच्या संकेतस्थळांवरून अथवा आपल्या गावातील दुकानांमधून खरेदी केल्यास फसवणूक होणार नाही.