नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात शेतकरी संसद भरवली जात आहे. त्या अनोख्या निदर्शनांमध्ये सोमवारी आसाम आणि ओडिशातील शेतकरीही सहभागी झाले.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी आठ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्याचे औचित्य साधून शेतकऱ्यांनी मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जंतर-मंतर परिसरात निदर्शने सुरू केली आहेत.
त्या निदर्शनांना शेतकरी संसद असे नाव देण्यात आले आहे. त्यामध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात चर्चा केली जात आहे. दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील शेतकरी सहभागी झाले आहेत. त्या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत आहे.
त्यातून इतर राज्यांतील शेतकरीही दिल्लीत दाखल होत आहेत. पुढील काही दिवसांत आंध्रप्रदेश आणि तामीळनाडूचे शेतकरीही देशाच्या राजधानीत पोहचणार आहेत. दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चाकडून केले जात आहे.