जळगाव – राज्यात आठवडाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक धरणं पूर्ण भरली असून धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे हतनूर धरण भरले असून धरणाचे ४१ दरवाजे पुर्ण उघडण्यात आले आहेत. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प असलेले हतनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वाढत्या पाण्याचा ताण पाहता तापी नदीपात्रात 1 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.