नवी दिल्ली – मार्च 2020 मध्ये करोनाच्या साथीमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्यावर लक्षणीय परिणाम झाला असे नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) या संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे.
लोकसभा सदस्य रमेश कौशिक आणि राजू बिश्त यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी एनसीएईआरचा संदर्भ देऊन सांगितले की, 2020 च्या पहिल्या तिमाहीमध्ये पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांपैकी एक कोटी 45 लाख, दुसऱ्या तिमाहीमध्ये 52 लाख आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये 18 लाख जणांवर नोकरी गमवाण्याची वेळ आली.
एनसीएईआरने तयार केलेल्या अहवालाचा मसुदा पर्यटन मंत्रालयाने मान्य केला असून तो अद्याप प्रकाशित झालेला नाही. पर्यटनावर होणारा खर्च, पर्यटनाचे प्रकल्प या सगळ्यांचे नुकसान आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम या सगळ्याचा विश्लेषणात्मक अहवाल गणितीय मॉडेलवर करण्यात आलेला आहे. पर्यटन क्षेत्राचे नुकसान भरून येण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. पर्यटनक्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठीच्या शिफारशीदेखील या अहवालात करण्यात आलेल्या आहेत.
भारत आणि करोनाची साथ, पर्यटन क्षेत्रात असणाऱ्या कुटुंबियांचे झालेले आर्थिक नुकसान आणि पूर्ववत होण्यासाठीचे धोरण या विषयावर पर्यटन मंत्रालयाने एनसीएईआरसमवेत जानेवारी 2021 मध्ये अभ्यास केला. आता करोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी योग्य शिफारशी करण्यासाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आलेला आहे.
पर्यटन क्षेत्राद्वारे देशाला प्राप्त होणाऱ्या परकीय चलनातही जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 76.3 टक्क्यांनी घट झालेली आहे.
देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) पर्यटन क्षेत्राचा हिस्सा सुमारे 2.5 टक्के एवढा असतो. करोनाच्या साथीमुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडण्याच्या स्थितीत असल्याने या क्षेत्राला सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी या क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येत आहे.
अगदी हॉटेल चालक-कर्मचारी, टूर ऑपरेटर, गाईड यांच्या प्रतिनिधींनी अनेकवेळा सरकारकडे मदतीसाठी निवेदने दिलेली आहेत. मात्र अद्याप त्यावर सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.