कोल्हापूर – धरण पाणलोट क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची संततधार कायम राहिली आहे. हीच परिस्थिती इचलकरंजी शहर परिसरात देखील कायम राहिली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी 54 फुटांवर पोहोचून ती आता धोक्याची पातळी ओलांडली आहे.
यामुळे नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने पूरबाधित क्षेत्र व नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, चंदगड या तालुक्यांमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पावसाची संततधार कायम राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
तर सर्व नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. तसेच इचलकरंजी शहरात वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सध्या झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. याठिकाणी सध्या पाणीपातळी 54 फुटांवर असून धोक्याची पातळी ओलांडली आहे.