नवी दिल्ली – शेतकरी आंदोलकांनी संसद भवनासमोर निदर्शने करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता ते दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात निदर्शने करणार आहेत. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी जवळपास आठ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.
अशात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशन काळात 22 जुलैपासून दररोज संसद भवनासमोर निदर्शने करण्याचा निर्णय याआधी शेतकरी संघटनांनी घेतला. त्या निदर्शनांत सुमारे 200 आंदोलक सहभागी होतील, असेही संघटनांकडून सांगण्यात आले. त्यातून शेतकरी संसदेला घेराव घालणार असल्याची चर्चा सुरू झाली.
प्रस्तावित निदर्शनांमुळे कायदा-सुव्यवस्थेशी निगडीत कुठले प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी दिल्ली पोलीस शेतकरी संघटनांपर्यंत पोहचले. पोलीस अधिकाऱ्यांशी बैठक झाल्यानंतर शेतकरी नेत्यांनी जंतर-मंतर परिसरात निदर्शने करणार असल्याचे स्पष्ट केले. शांततामय मार्गाने निदर्शने करण्याची ग्वाहीही शेतकरी संघटनांनी दिली आहे. संसदेचे अधिवेशन 13 ऑगस्टला समाप्त होणार आहे.